लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : गुजरात राज्यातील नवसारी साखर कारखान्यात बंधारे येथील शेतकरी आपला १३ टन ऊस भरून ट्रक घेऊन जात असताना नवापूर तालुक्यातील बंधारे गावात अरुंद रस्त्याने ट्रक अनियंत्रित होऊन उलटून अपघात झाला. यात चालक जखमी झाला असून त्याला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नवापूर तालुक्यातील अरुंद व खराब रस्त्यामुळे अपघात होत आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने उपायोजना करण्याची गरज आहे. नवापूर तालुक्यातील बंधारे गावात अरुंद रस्ता आहे. पुलाजवळ हा ट्रक उलटून अपघात झाला आहे. गेल्यावर्षी अशाच पद्धतीने उसाचे ट्रक व ट्रॅक्टर याठिकाणी उलटून अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तरीही संबंधित विभाग कुठलीही उपाययोजना करताना दिसून येत नाही. बिलबारा ते चिंचपाडा रस्त्याची प्रचंड दूरवस्था झाली आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने शेतकऱ्यांना आपला ऊस कारखान्यापर्यंत नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. १३ टन उसाने भरलेला ट्रक उलटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जेसीबीच्या सहाय्याने ऊस दुसर्या वाहनात भरण्यात आला आणि जेसीबीच्या मदतीने ट्रक उचलण्यात आला. काही काळ या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. नवापूर तालुक्यातील ग्रामीण रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे.
अरुंद रस्त्यामुळे उसाचा ट्रक उलटून अपघात चालक जखमी; चिंचपाडा-बंधारे रस्त्यावरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 3:16 PM