लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भाजपला ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून धडा शिकवण्याची संधी कार्यकर्त्यांना उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत शिवसेनेचा भगवा फडकवा असे आवाहन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.नंदुरबार येथे आज बुधवारी शिवसेनेच्या जिल्हा मेळावा घेण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे नंदुरबारला सकाळी आगमन झाल्यानंतर वाघेश्वरी चौफुलीवर त्यांचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे यांनी स्वागत केले.व्यासपीठावर आमदार मंजुळा गावित,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राम रघुवंशी, नगरसेवक परवेज खान, शिवसेना नेते संजय उकिरडे, महिला आघाडीचा जिल्हाध्यक्ष रीना पाडवी, जिल्हा उपप्रमुख रवींद्र गिरासे, रुपसिंग पाडवी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश गावित,जिल्हा परिषदेचे माजी सभापती विक्रमसिंग वळवी, तळोदा पंचायत समितीचे माजी सभापती आकाश वळवी, माजी सभापती दत्तू चौरे, सतीश वळवी उपस्थित होते.यावेळी वाघेश्वरी चौफुली व मोठा मारुती मंदिर चौकात शिवसेना शाखा फलकाचे अनावरण राज्यमंत्री सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी 'जय भवानी जय शिवाजी' च्या घोषणा दिल्या. दुपारी १२ वाजता रघुवंशी मंगल कार्यालयात जिल्हा मेळावा घेण्यात आला. मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, वर्षभर शिवसेना संकटाचा मुकाबला करीत आहे. प्रत्येक संकटाशी मुकाबला करणे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आहे. राज्याचा कारभार नियोजनबद्ध सुरू आहे. गोरगरीब, शेतकरी, दलित, आदिवासी ओबीसी त्याचप्रमाणे समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याचे काम शिवसेनेचं सरकार करत आहे. दर महिन्याला नंदुरबार जिल्ह्याचा दौरा करणार आहे. आचारसंहिता संपल्यानंतर संपर्क ऑफिस उघडून जनतेच्या समस्यांचे निवारण करण्यात येणार असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.जिल्हा परिषद निवडणुकीत प्रत्येक घरापर्यंत शिवसेना पोहोचवली. जिल्हाभरात गाव तिथे शाखा उघडण्यात येणार आहेत. सर्व शिवसैनिकांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुका संघटीतपणे लढवायच्या आहे. शिवसेनासाठी जीवाचे रान करून येणाऱ्या कालावधीत जिल्ह्यातील सर्वच निवडणुका शिवसेना पुरस्कृत लढवल्या जातील असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले. मेळाव्यात सेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिल्हा प्रमुख डॉ.विक्रांत मोरे म्हणाले, मागील पाच वर्षाच्या भाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना घुमजाव करण्यात आले. परंतु, वर्षभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेऊन अवकाळी पाऊस,अतिवृष्टीचा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत केली. मेळाव्याचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पदाधिकारी गजेंद्र शिंपी यांनी केले
भाजपला धडा शिकविण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 12:31 PM