लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दिल्ली शेतकरी आंदोलनातील शहीदांना सत्यशोध शेतकरी सभेतरर्फे रविवारी विसरवाडी येथे आदरांजली वाहण्यात आली. शेतकरी कायदा रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.दिल्लीत २९ नोव्हेंबर पासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु झाले आहे. मात्र केंद्र सरकार अजुनही शेतकरी विरोधी कायदे रद्द करायला तयार नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन दिल्लीच्या सिमेवर दिवस रात्र सुरू आहे आणि आता देशभरातील लाखो लोक दिल्लीकडे निघण्याच्या तयारीत आहे. या आंदोलनात आतापर्यंत २९ शेतकरी शहीद झाले आहे. संत बाबाराम सिंग यांनी शेतकरी विरोधी असलेले हे काळे कायदे रद्द व्हावे म्हणून स्वतःला गोळी झाडून आपला देह त्याग केला आहे. रवािवार २० डिसेंबर रोजी संपूर्ण देशात शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने केंद्रीय कार्यालय विसरवाडी येथे संघटनेच्या कार्यालयासमोर कॉम्रेड रामसिंग गावित यांच्या अध्यक्षतेखाली आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी कारणसिंग कोकणी, रामसिंग गावीत, जगन गावीत, रणजित गावित, दिलीप गावित, होमबाई गावित, शांताबाई गावीत, देविदास पाडवी, कांतीलाल गावीत, मंगा गावीत, सेल्या वळवी, जेका गावीत, सुनिल गावीत यांची शेतकरी आंदोलनाच्या मागण्या आणि शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्या संदर्भात व आदरांजलीपर भाषणे झाली. दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून व म. फुले रचित सत्याचा अखंड सामूहिकपणे गाऊन कार्यक्रम पार पडला.
शेतकरी आंदोलनातील शहिदांना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 12:15 PM