नाशिक : मुंबईमार्गे पायपीट करणाऱ्या मजुरांना कसारा नाकाबंदी पॉइंटवरून नाशिक विभागाच्या हद्दीतून इगतपुरी, घोटी मार्गे पुढे थेट मध्यप्रदेश-महाराष्टÑच्या सीमेपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून मोफत नेऊन सोडले जात आहे. कालपासून अद्याप नाशिक विभागातून ७९ बसेसद्वारे मजूरांना मध्यप्रदेश सीमेपर्यंत नेऊन सोडण्यात आल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.शहरात कसारा घाटातून मुंबईतील परप्रांतीय मजूरांचे जत्थे पायी प्रवास करत दाखल होत होते. सरकारने मोफत एसटीची सेवा मजूरांसाठी राज्याच्या सीमेपर्यंत उपलब्ध करून दिली असली तरी बहुतांश प्रवासी मजूर आपला बि-हाड घेत पायपीट करताना दिसून येत आहेत. काही मजूर ‘डिस्टन्स’ बाजूला ठेवत मिळेल त्या मालवाहू वाहनांमधूनही प्रवास करत आहेत. मात्र प्रादेशिक परिवहन विभाग, ग्रामिण पोलीस, महसूल विभागाकडून सातत्याने गस्ती पथकांद्वारे मजुरांना आवाहन केले जात आहे. सरकारने एसटीची मोफत सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, यामुळे कोणीही पायी किंवा अन्यप्रकारच्या मालवाहू वाहनांमधून प्रवास करू नये असे आवाहन मराठी, हिंदी भाषेतून केले जात आहे. शनिवारपासून बसेस नाशिक विभागातून मध्यप्रदेशच्या सीमेपर्यंत सोडल्या जात आहेत. शनिवारी ४२ तर रविवारी दुपारी चार वाजेपर्यंत ३७ बसेसमधून मजूरांची वाहतूक करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी दिली.मुंबईकडून येणा-या मजुरांना कसारा नाकाबंदी पॉइंटवर मॅँगो ज्यूसच्या बाटल्याही प्रशासनाकडून पुरविल्या जात आहेत. सुमारे ५००० बाटल्यांची येथे व्यवस्था करण्यात आल्याचे मुंडावरे यांनी सांगितले. नागरिकांनी कुठल्याहीप्रकारे पायी प्रवास करू नये, शासनाच्या मोफत एसटी सुविधेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
नाशिकमधून अद्याप ७९ बसेस मजूरांना घेऊन रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 16:49 IST
शहरात कसारा घाटातून मुंबईतील परप्रांतीय मजूरांचे जत्थे पायी प्रवास करत दाखल होत होते. सरकारने मोफत एसटीची सेवा मजूरांसाठी राज्याच्या सीमेपर्यंत उपलब्ध करून दिली
नाशिकमधून अद्याप ७९ बसेस मजूरांना घेऊन रवाना
ठळक मुद्देमजुरांना कसारा नाकाबंदी पॉइंटवर मॅँगो ज्यूसच्या बाटल्या