बीड : विषारी द्रव प्राशन केलेल्या प्रेमीयुगुलावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मुलीच्या नातेवाईकांनी कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यानंतर मुलीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात मुलीच्या भावासह दोन चुलत्यांना येथील प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एल. पानसरे यांनी शुक्रवारी दोषी ठरवत जन्मठेप व प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. शहरातील धोंडीपुरा भागातील सुषमा काळवणे (वय २१) व दशरथ कुडके (वय २५) यांच्यामध्ये प्रेमप्रकरण सुरु होते. दोघेही उच्च शिक्षित असले तरी सुषमा हिच्या घरातून विवाहास विरोध होता. २३ डिसेंबर २०१४ रोजी सुषमाच्या घरातील सर्वजण तिच्यासाठी मुलगा पाहण्यास बाहेर गावी गेले होते. याच दिवशी सुषमा व तिचा प्रियकर दशरथ कुडके हे खंडेश्वरी परिसरात असलेल्या नाळवंडी नाका येथे गेले. आपला विवाह होणार नाही या नैराश्यातून दोघांनी विष प्राशन केले. याची माहिती दशरथ कुडके याचा मित्र धनंजय चव्हाण यास कळताच त्याने दोघांनाही शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. सुषमाच्या घरातील लोक परत बीडला आल्यानंतर हा प्रकार त्यांना कळताच संतप्त झालेला तिचा भाऊ सोनू उर्फ विठ्ठल काळवणे, चुलते बंडू काळवणे, बाबू काळवणे हे रुग्णालयात आले. बरोबर आणलेल्या कोयत्याने दोघांवर वार केले. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. २४ डिसेंबर २०१४ रोजी उपचार सुरु असताना सुषमाचा मृत्यू झाला तर दशरथ कुडके यास पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविले. नंतर तो वाचला.या प्रकरणी शहर ठाण्यात सोनू काळवणे, बंडू काळवणे, बाबू काळवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास तत्कालीन स.पो.नि. शेळके यांनी करून या प्रकरणी प्रमुख व जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणी सहायक सरकारी वकील मिलिंद वाघीरकर यांनी सरकारी पक्षाच्या वतीने बाजू मांडली. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. (प्रतिनिधी)
अन् फिर्यादीच निघाला आरोपी
By admin | Published: November 12, 2016 1:01 AM