नाशिक : बाळासाहेब विखे-पाटील यांच्या कल्पनांचा व दूरदृष्टीचा उपयोग पुढील अनेक वर्षे राज्य व केंद्र शासनाला मोलाचे मार्गदर्शन व प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन कॉँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख आमदार भाई जगताप यांनी केले. सोमवारी (दि.२) शहर कॉँग्रेस पक्षाच्या वतीने कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री बाळासाहेब विखे-पाटील यांच्या निधनानिमित्त शोकसभेचे आयोजन कॉँग्रेस कमिटीत करण्यात आले होते. यावेळी कॉँग्रेस शहराध्यक्ष शरद अहेर यांनी दिवंगत बाळासाहेब विखे - पाटील यांच्या कार्याबद्दल बोलताना सांगितले की, राज्यातील पहिले पॉलिटेक्निक महाविद्यालय त्यांनी काढले. याप्रसंगी माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, प्रभारी माजी खासदार उल्हास पाटील यांनीही बाळासाहेब विखे यांच्याबाबत श्रद्धांजलीवर मनोगत व्यक्त केले. भाई जगताप यांनी बाळासाहेब विखे-पाटील यांचा जीवनपट उलगडून त्यांनी केलेल्या समृद्ध कार्याचा व महाराष्ट्रासाठी किती उपयोग झाला ते विशद केले. याप्रसंगी प्रदेश सचिव अविनाश समिष्टे, युवक कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे, प्रदेश सचिव डॉ. हेमलता पाटील, नगरसेवक राहुल दिवे, लक्ष्मण जायभावे, ब्लॉक अध्यक्ष बबलू खैरे, उद्धव पवार, सुरेश मारू, स्वप्नील पाटील, हनिफ बशीर, गोपाळ जगताप, राजेंद्र बागुल, पांडुरंग बोडके, राजकुमार जैफ, किशोर बाफना, नाना निकुंभ, योगीता अहेर, भगवान अहेर, गणेश साने, सुनील आव्हाड, कैलास महाले आदि उपस्थित होते.
बाळासाहेब विखे-पाटील यांचे कार्य प्रेरणादायी
By admin | Published: January 03, 2017 1:51 AM