नाशिक : देशातील काळा पैसा, बनावट नोटा व भ्रष्टाचार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्याची घोषणा मंगळवारी (दि़ ८) केली़ तसेच नागरिकांनी आपल्याकडील नोटा बँका व पोस्टामध्ये बदलून घेण्याचे आवाहन केले़ त्यामध्ये बुधवारी बँकांना सुटी देण्यात आल्याने तर दोन दिवस अर्थात गुरुवारपर्यंत एटीएम बंद असल्याने नागरिकांची गैरसोय झाली़ गुरुवारी (दि़ १०) सकाळी बँका सुरू होण्यापूर्वीच नागरिकांनी नोटा बदलून घेण्यासाठी बॅँक व पोस्ट आॅफिसच्या बाहेर लांबच लांब रांगा लावल्या होत्या़देशाच्या चलनातून पाचशे व एक हजार रुपयांची नोट अचानक रद्द केल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली़ नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी गुरुवारपासून बँका व पोस्ट आॅफिसमध्ये नोटा बदलून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे़ १० ते ३० नोव्हेंबर या कालावधीत नोटा बदलण्याची मुदत दिल्याने नागरिकांनी बाद झालेल्या नोटा राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये भरण्यासाठी बँकांमध्ये मोठी गर्दी केली होती़ बँकेत पैसे जमा करणाऱ्या नागरिकांकडून त्यांच्या ओळखपत्राची (आधार कार्ड / पॅन कार्ड / वाहन परवाना) छायांकित प्रत व बँकेचा अर्ज घेतल्यानंतर त्यांच्याकडील नोटा जमा करून त्या बदल्यात चार हजार रुपयांच्या नवीन नोटा व सुटे पैसे दिले जात होते़ (प्रतिनिधी)
नाशिककरांचा गुरुवार बॅँकेत
By admin | Published: November 10, 2016 11:55 PM