र्यंबकेश्वर : येथील संत निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानच्या वतीने शनिवारी आयोजित भक्तनिवास भूमिपूजन सोहळ्यात जिल्ह्याच्या आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये स्थानिक विरुद्ध-परका त्याचबरोबर विकासकामांच्या मुद्द्यावरून चांगलाच कलगीतुरा रंगला. यामुळे काही काळी उपस्थितांमध्ये हश्याचे कारंजेही उडाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिन्नरच्या भैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. त्र्यंबकबाबा भगत होते. त्र्यंबकेश्वर येथे आयोजित या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, माजी पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे, खासदार हेमंत गोडसे, हरिश्चंद्र चव्हाण,आमदार निर्मला गावित, बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, माजी खासदार देवीदास पिंगळे, स्वामी सागरानंद सरस्वती, राजाराम पानगव्हाणे, निवृत्तिनाथ संस्थानचे अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड, माजी अध्यक्ष मुरलीधर पाटील, महामंडलेश्वर रामकृष्ण महाराज लहवितकर, लक्ष्मण सावजी, सुरेश पाटील, दामोदर मानकर आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले की, धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने नाशिक प्रसिद्ध असून संपूर्ण जिल्ह्याला पर्यटनाच्या दृष्टीने चालना मिळणे गरजेचे आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळ््यादरम्यान सर्वांगिन विकास झाले असून यातच एकूण ४ कोटी ६५ लाख रुपये खर्चून निवृत्तीनाथ भक्त निवास साकारत असल्याचे पालकमंत्री गिरिश महाजन यांनी सांगितले. निधी आणताना फारमोठ्या प्रमाणात ओढातान होते. मात्र भुजबळ यांनी आपल्या कार्यकाळात आणलेल्या निधीमुळे ही विकासकामे झाली असून त्यामुळे त्र्यंबकच्या बैभवात भर पडल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी हभप रामेश्वर महाराज पुणेकर, आमदार सीमा हिरे, राजाराम पानगव्हाणे खासदार हेमंत गोडसे, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, महामंडलेश्वर रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी युपीएसी परीक्षेत यश मिळविलेल्या उमेश खांडबहाले व त्याच्या वडिलाचा सत्कार करण्यात आला़ विशेष म्हणजे खांडबहाले कुटुंबीयांनी संस्थानला एक लाख अकरा हजार रूपयांची देणगी दिली़ कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवस्थानचे विश्वस्त पुंडलिकराव थेटे, ह़भ़प़ पंडिराव कोल्हे, डॉ़ धनश्री हरदास, सौ़ ललिता शिंदे आदिंनी परिश्रम घेतले़ (वार्ताहर )
विकासकामांचा पाढायाप्रसंगी बोलताना जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांचा पाढा वाचतानाच आपण स्थानिक असल्याचा मुद्दाही उपस्थित केला. ते म्हणाले, मी नाशिकचा असल्याने मला नाशिकच्या प्रश्नांची पूर्ण माहिती आहे. अर्थात नाशिकच्या विकासासाठी आम्ही एकदिलाने काम करू असे आश्वासनही त्यांनी दिले. भुजबळ यांच्यानंतर बोलावयास उभे राहिलेल्या पालकमंत्री गिरीश महाजन यांनी हाच धागा पकडून आपल्या भाषणाला सुरुवात करत मी जरी परजिल्ह्यातील असलो तरी काम करणार्यांना कुठेही परकेपणा वाटत नाही. दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा मी शांततेत पार तर पाडलाच शिवाय तो थेट सातासमुद्रापार पोहोचविला. जगभरात त्याचे कौतुक झाले.त्यानंतर छगन भुजबळ यांच्याकडे कटाक्ष ताखत ते म्हणाले तुम्ही कामे तर भरपूर सुचिविली पण यासाठी तेवढा वेळही पाहिजे. यासाठी किमान दहा ते बारा वर्षे लागतील (हशा) तुम्ही इतिके दिवस सत्ता भोगली आम्ही चार वर्षात काय करणार तेवढी संधी आम्हाला द्या. त्यांच्या या वाक्यावर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.