नाशिक : बँकेतून बोलतोय, तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक केले आहे, ते पुन्हा सुरू करण्यासाठी एटीएम नंबर व पिनकोड सांगा, अशा विविध क्लृप्त्या वापरून सायबर गुन्हेगार नागरिकांनी कष्टाने कमावलेली संपत्तीची काही सेकंदात लूट करतात़ त्यामुळे अशा भामट्यांपासून बचाव करण्यासाठी आता नागरिकांनाच जागरूक व्हावे लागणार आहे़ याचे प्रमुख कारण म्हणजे देशाची वाटचाल ही डिजिटलकडे होत चालली असून, येत्या दोन वर्षांत डिजिटलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे प्रतिपादन सायबर तज्ज्ञ विकास नाईक यांनी शनिवारी (दि़१२) एचआरडी सेंटर येथे केले़ रोटरी क्लब आॅफ नाशिक वेस्ट, नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे विधी महाविद्यालय व आविष्कार या संस्थांमार्फत विधी साक्षरता उपक्रम सुरू करण्यात आला आहे़ या उपक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी ‘सायबर गुन्हे व उपाययोजना’ या विषयावर सायबर तज्ज्ञ विकास नाईक व अॅड़ नागनाथ गोरवाडकर यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी आयोजित व्याख्यानात नाईक बोलत होते़ नाईक यांनी सांगितले की, बहुतांशी नागरिकांकडे स्मार्ट फोन आहेत, याद्वारे इंटरनेटचा वापर करून अॅप्लिकेशन डाऊनलोड केले जातात़ यावेळी सावधानता न बाळगल्यास आपली गोपनीय माहिती लिक होऊ शकते़ मोबाइल तंत्रज्ञानाच्या फायद्यांबरोबरच तोटेही असून हॅकर माहिती मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतात. या उपक्रमाद्वारे दर पंधरा दिवसांनी कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार यांनी सांगितले़ या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे माजी प्रांतपाल रोटेरियन दादासाहेब देशमुख उपस्थित होते़ प्रास्ताविक अॅड़ इंद्रायणी पटणी यांनी केले़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश्वरी बालाजीवाले यांनी तर आभार प्राध्यापक चारुशिला खैरनार यांनी मानले़ (प्रतिनिधी)
‘सायबर गुन्हेगारांपासून खबरदारी आवश्यक’
By admin | Published: November 14, 2016 1:18 AM