निफाड : यंदा भाव पडल्याने उत्पादक हवालदिलनिफाड : यंदा कवडीमोल भाव मिळाल्याने उन्हाळी कांद्याने उत्पादकांना रडवले आहे. चांगला भाव मिळेल या आशेने चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्यालाही कांद्याना मोड यायला लागल्याने कांदा उत्पादकांचे धाबे दणाणले आहे.यावर्षी तालुक्यात कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने भाव घसरले आहेत. आज ना उद्या चांगला भाव मिळेल या आशेने काही शेतकऱ्यांनी आपला कांदा चाळीत साठवून ठेवला होता. परंतु सरकारने नियमनमुक्तीचा नियम लागू केल्याने बाजार समित्यांनी या नियमास विरोध करीत जवळ जवळ दोन महिने बाजार समित्या बंद ठेवल्या होत्या. त्यामुळे सर्व कांदा चाळीमध्ये तसाच पडून राहिला. उन्हाळा, बेसुमार पाऊस यामुळे चाळीतील बराच कांदा सडून गेला. त्यात लिलाव चालू झाल्यानंतर कांद्याला २०० ते ७०० रुपये इतका कमी भाव मिळत असल्याने यात उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडून पडले आहे. दिवाळीतील सुटीनंतर बाजार समित्यांमधील लिलाव सुरू झाले. परंतु कांद्याचे भाव ७०० च्या वर गेले नाही. कांद्याला सरासरी फक्त ५०० रूपये भाव मिळाला. सद्य स्थितीत बराच कांदा चाळीत तसच पडून आहे. त्यातील बराच कांदा उन्हाळ्यात खराब झालेला असताना उर्वरित कांद्याला अतिथंडीमुळे मोठ्या प्रमाणात मोड येण्यास सुरुवात झाली आहे. ६० टक्के कांदा खराब झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक होणार असून, कांदा उत्पादकांचे यावर्षीचेही आर्थिक गणित कोलमडून पडले आहे. तालुक्यातील राजकीय नेते आपला वाढदिवस मोठा खर्च करून साजरे करताना दिसत आहे. परंतु कांद्याच्या कोसळलेल्या भावांमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू असताना कांदा प्रश्नावर आंदोलन करायला ना या राजकीय नेत्यांना वेळ आहे, ना शेतकरी संघटनांना. सर्वच शेतकरी अस्वस्थ आहे. (वार्ताहर)
चाळीतील शिल्लक कांद्याला मोड
By admin | Published: November 15, 2016 12:19 AM