सायखेडा : ५०० व १०००च्या नोटा बंद झाल्यामुळे ग्रामीण जीवनावर त्याचा मोठा परिणाम झाला असून, त्याचा प्रत्यय गुरुवारी सायखेडा येथील आठवडे बाजारात पाहायला मिळाला. ५००० किंवा १०००ची नोट दुकानदार घेत नसल्याने ग्राहकांना सुट्या पैशांसाठी वणवण करावी लागली. दोन दिवसात जवळ असलेली सर्व मोड संपल्याने आज नेमका आठवडे बाजार असल्याने दुकानदार सुटे पैसे द्या किंवा पाचशे रुपयांची खरेदी करा, असा आग्रह धरत होते तसेच दहा किंवा पंधरा रुपये किमतीची भाजी खरेदी करण्यासाठी ५००ची नोट दुकानदार कशी घेणार आणि प्रत्येक ग्राहकाला सुटे पैसे कोठून देणार, असा प्रश्न दुकानदारांपुढे असल्याने ग्राहकाला तोंड देताना अवघड झाले. ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर आपल्याकडे असलेल्या नोटांचे आता काय करायचे या संदर्भात माहिती नसल्याने गोंधळून गेले आहे. काही जण आठवडे बाजारच असल्याने दुकानदारांना नोटा खपविण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे दुकानदार आणि ग्राहक यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. एकंदरीतच सायखेडा बाजार आज ५०० व १००० रुपये नोटांनी गाजला आणि चर्चेचा विषय ठरला होता. (वार्ताहर)
ग्रामीण भागात ग्राहकांची वणवण
By admin | Published: November 10, 2016 10:52 PM