नाशिककरांना पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात ४० टक्के साठा असून, सर्वात मोठे असलेल्या दारणा धरणातही ५७ टक्के साठा आहे. या धरणाच्या पाण्यावर मराठवाडा, नगर जिल्ह्याचे आरक्षण आहे. गंगापूर धरणाच्या पाण्यावर नाशिक प्रमाणेच अन्य ठिकाणचे आरक्षण असल्याने येत्या काही दिवसात त्यातून आवर्तन सोडावे लागणार असल्याने गंगापूर धरणातही पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. कळवण, सटाणा, मालेगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चणकापूरमध्ये ४१ टक्के जलसाठा असून, हरणबारी धरणात देखील ५५ टक्के जलसाठा आहे. जळगावकरांची पाण्याची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा आहे. पावसाळा सुरू होण्यास अजून दोन महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. यंदा समाधानकारक पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असला तरी, मान्सूनचे वेळेवरच आगमन होणार का याबाबत संभ्रम असल्याने धरणातील उपलब्ध साठ्यावरच दोन महिने तहान भागवावी लागणार आहे.
जिल्ह्यातील धरणसाठा पोहोचला ३८ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 4:15 AM