नाशिक : जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांनी जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आलेल्या एकूण सर्व बदल्यांची, तसेच पदाधिकाऱ्यांच्या अधिकारातील बदल्यांची माहिती प्रशासनाकडून मागविली आहे. विशेष म्हणजे शिक्षण विभागांतर्गत करण्यात आलेल्या बदल्यांकडेच त्यांचा रोख असल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप संपतराव सकाळेंकडून करण्यात येत आहे. त्यातच त्यांनी जिल्हा परिषदेचा निधी सर्व सदस्यांना समान वाटप झाला पाहिजे, त्यासाठी आपण सर्वपक्षीय सदस्यांचा एक दबाव गट निर्माण करू, असेही सांगितले आहे. मंगळवारी (दि.२४) त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून नुकत्याच करण्यात आलेल्या बदल्यांची माहिती मागविली आहे. बदल्यांमध्ये अनियमितता झाल्याचा त्यांचा आरोप आहे. विशेषत: शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांमध्ये तसेच पदाधिकाऱ्यांच्या अधिकारात करण्यात आलेल्या बदल्यांबाबत त्यांनी संशय व्यक्त केला आहे. न्यायालयाचे आदेश काय आहेत, प्रत्यक्षात बदल्या कोणत्या करण्यात आलेल्या आहेत, असे अनेक प्रश्न त्यांनी प्रशासनाकडे उपस्थित केले आहेत.(प्रतिनिधी)