पंचवटी : काळा पैसा, बनावट नोटा आणि भ्रष्टाचारावर आळा बसावा यासाठी शासनाने पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याने सर्वसामान्य नागरिकांपाठोपाठ शेतकऱ्यांची चांगलीच गैरसोय झाली. आडत्यांकडून रोख रक्कम घेणाऱ्या शेतकऱ्यांना बुधवारी रोख पैसे मिळू शकले नाहीत, त्यामुळे उधारीत माल विकावा लागला.मंगळवारी रात्री शासनाने पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकरी, आडते व व्यापाऱ्यांनाही फटका बसला. शेतमालाचा लिलाव झाल्यानंतर आडत्यांकडून मिळणारी रक्कम लागलीच मिळणार नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आलेल्या काही शेतकऱ्यांना शेतमालाची किरकोळ रक्कम मिळाली. त्यातही पाचशे, हजार रुपयांच्या नोटा आडत्यांकडून मिळाल्या त्या घ्याव्या लागल्या, तर काही शेतकऱ्यांना आडत्यांनी दोन दिवसांची मुदत घेऊन रकमेची परतफेड करण्याचे आश्वासन दिले आहे. बाजार समितीत शेतमालाचा लिलाव झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या खऱ्या; मात्र व्यापाऱ्यांनी आडत्यांना दिलेल्या पाचशे व एक हजार रुपये दराच्या नोटा काही आडत्यांनी स्वीकारल्या नाही तर जी रक्कम असेल ती परस्पर बॅँकेत जमा करण्यास सांगितली. शेतमाल विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून पैसे काढून देण्याची जबाबदारी ही आडत्याची असते. काही व्यापाऱ्यांनी आडत कंपनीत रक्कम जमा करण्यासाठी धाव घेतली. (वार्ताहर)
शेतकरक्कम नसल्याने अडचण : आडत्यांनी मागून घेतली मुदत
By admin | Published: November 11, 2016 1:00 AM