नाशिक : चांगले मार्क मिळवून डॉक्टर झालेला मुलगा, विवाह योग्य झालेली मुलगी असे कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण असतानाच पद्मनाभ काळे हे आपल्या नोकरीचा राजीनामा देतात आणि खेळीमेळीत चाललेल्या दैनंदिन आयुष्यात कसे कटू प्रसंग येतात याचे दृश्य सांस्कृतिक कार्य संचालनालय विभागातर्फे आयोजित ५६व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेतील ‘रखेली’ नाटकात दाखविण्यात आले.पद्मनाभ काळे यांचा मुलगा राजेंद्र याला डॉक्टर होऊन पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जायचे असते आणि मुलगी नीता हिला आपल्या प्रियकराबरोबर लग्न करून विदेशात फिरायला जायचे असते परंतु आपल्या वडिलांनी नोकरीचा राजीनामा देऊन कारखाना स्थापन करण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे मुलांचे स्वप्न भंगते आणि त्यांचे आपल्या वडिलांशी वाद होतात. अशा परिस्थितीत प्रिया नावाच्या रखेलीचे घरात आगमन होते आणि घरातील कलहात भर पडते. रखेलीच्या आतापर्यंतच्या जीवन प्रवासाची माहिती जाणून घेत पद्मनाभ काळे तिला घरात आश्रय देतात आणि कुटुंबात नवीन वादाला तोंड फुटते. हा वाद पराकोटीला जाऊन काळे हे आपली सगळी संपत्ती थोरला मुलगा राजेंद्रच्या नावावर करून प्रियासोबत घराबाहेर पडतात. प्रिया ही अपर्णाचीच मुलगी असते. अपर्णाचा महाविद्यालयीन जीवनातील मित्र दयाळ याच्या संबंधातून प्रियाचा जन्म होतो. एकीकडे पद्मनाभ आणि प्रियाचा संसार आनंदात सुरू असताना दयाळ पद्मनाभ काळे यांना भेटून सगळी हकिकत कथन करतो. प्रिया ही अपर्णाचीच मुलगी असल्याचे जेव्हा पद्मनाभला कळते तेव्हा पद्मनाभ झोपेच्या गोळ्या घेऊन स्वत:चे आयुष्य संपवतो आणि रंगमंचाचा पडदा पडतो. लेखक चिं. त्र्य. खानोलकर लिखित आणि नाना देवरे दिग्दर्शित अक्षरा क्रिएशनची निर्मिती असलेल्या या नाटकात प्रदीप देवरे, ज्योती वराडे, शांतीलाल वेताळ, महेश खैरनार, शुभम दाणी, वंदना कचरे, पूजा पूरकर या कलाकारांचा समावेश आहे. रखेली या नाटकाची निर्मिती प्रदीप देवरे, निर्मिती सहाय्य राजेंद्र महाले, नेपथ्य गणेश सोनवणे, संगीत रोहित सरोदे, प्रकाश योजना किरण जायभावे, तर रंगभूषा माणिक कानडे यांची होती. या स्पर्धेसाठी अरविंद लिमये, भालचंद्र कुबल, शफी नाईकवाडे परीक्षकांची भूमिका पार पाडणार आहे. (प्रतिनिधी)आज सादर होणारे नाटक‘विदूषक’चैतन्य बहुउद्देशीय संस्था, धुळे. (वेळ : संध्या ७ वाजता)नाट्य स्पर्धेचे उद्घाटन उत्साहातसांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यातर्फे आयोजित ‘५६व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे’ सोमवारी (दि. ७) प्रमुख पाहुणे जयंत देशमुख आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि नटराज पूजन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी जयंत देशमुख आणि रवींद्र कदम यांनी नाशिकचा रंगमंच सांस्कृतिक क्षेत्राचा साक्षीदार असल्याचे सांगून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. उद्घाटनाप्रसंगी राजेश जाधव, जयंत देशमुख, भालचंद्र कुबल, अरविंद लिमये, शफी नाईकवाडे, रवींद्र कदम, पूजा गोरे, गायत्री देशमुख, मीना वाघ आदि उपस्थित होते. या नाट्यस्पर्धेअंतर्गत गुरुवार (दि. २४) पर्यंत नाटकांची मेजवानी मिळणार आहे.
सुखी कुटुंबाच्या वाताहतीचे विदारक दृश्य ‘रखेली’
By admin | Published: November 08, 2016 1:27 AM