नाशिक : सातपूर येथील कामगारनगर आणि औद्योगिक वसाहतीच्या दरम्यान एका विकासकाच्या कृत्रिम तलावामुळे परिसरात डासांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. शहरात डेंग्यू रुग्ण वाढत असताना परिसरात असलेल्या या तलावामुळे येथील नागरिकांचेदेखील आरोग्य धोक्यात आले आहे. पालिका आयुक्तांची या अनारोग्याबाबत दुर्लक्षाची भूमिका कशासाठी, असा प्रश्न परिसरातील नागरिकांनी केला आहे.कामगारनगर आणि औद्योगिक वसाहतीच्या सीमारेषेवरच काही गृहनिर्माण संस्था तयार झाल्या आहेत. याच परिसरात कोणा विकासकाने इमारत बांधण्यासाठी पन्नास बाय तीस आकाराचा पाया खोदला. परंतु नंतर बांधकामच केलेले नाही. परिणामी दरवर्षी पावसाळ्यात याठिकाणी कृत्रिम तलाव तयार होतो. पावसाळा संपला की याच पाण्यावर डासांची उत्पत्ती होते आणि त्याचा परिसरातील नागरिकांना त्रास होतो. परिसरातील नागरिकांनी अनेकदा महापालिकेकडे यासंदर्भात तक्रारी केल्या आहेत. त्यानंतर पालिकेने दखल घेतली की, या कृत्रिम तलावात माती टाकली जाते तर कधी पाण्याचा उपसा केल्याचे चित्र तयार केले जाते. परंतु पुढे काहीही होत नाही. सध्या याठिकाणी डासांची होणारी उत्पत्ती ही नागरिकांची डोकेदुखी ठरली आहे. सध्या डेंग्यू डासांमुळे शहरात डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढले असून अनेक ठिकाणी डेंग्यू रुग्ण दगावल्याचे सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत महापालिकेकडून डास निर्मूलन फवारणी दूरच परंतु संबंधित खासगी विकासकाला तंबी देऊन पाणीही उपसले जात नसल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. सदरचे खासगी कृत्रिम तरण तलाव आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या स्मार्ट सिटी संकल्पनेशी संबंधित आहे काय किंवा अशा प्रकारचे कृत्रिम तलाव तयार करणाऱ्यांना ज्यादा एफएसआय किंवा टीडीआरची तरतूद आहे काय, असा प्रश्न येथील रहिवाशांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)
कृत्रिम तलावामुळे डासांचा उपद्रव
By admin | Published: November 21, 2015 11:47 PM