ताहाराबाद : केंद्र शासनाने पाचशे आणि हजार रुपयांचे चलन बंद केल्याने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली असून, जनतेत प्रचंड संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.ग्रामीण व आदिवासी भागातील जनतेत शासनाच्या वरील निर्णयाने प्रचंड संभ्रमावस्था तयार झाली आहे. मोसम खोऱ्यातील गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, आदिवासी बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणावर चलबिचल निर्माण झाली असून, हा वर्ग अडचणीत सापडला आहे. यातील बहुतांश लोकांचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते नाही. इतर सर्व बँक व पतसंस्थांमधील सर्व व्यवहार बंद असल्याने जनता हैराण झाली आहे. बँकेत बदलून मिळत असलेले चलन स्वीकारण्यासाठी होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला जनता वैतागली आहे. चलन बदलण्यासाठी संपूर्ण दिवसाचा वेळ मोजावा लागत असल्याने मजूरवर्गाचे मोठे नुकसान होत आहे. चलन बदलण्यासाठी दिवसभराची रोजंदारी बुडवावी लागत आहे. बदली चलनात जर बँकेने दोन हजाराचे चलन दिले तर दुष्काळात तेरावा महिना अशीच स्थिती होत आहे. (वार्ताहर)
अर्थव्यवस्था ठप्प
By admin | Published: November 17, 2016 12:01 AM