पंचवटी : प्रभाग क्रमांक तीनमधील हिरावाडी (अयोध्यानगरी) परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी घरांसमोर पक्के बांधकाम करून अनधिकृतपणे कब्जा करत महापालिकेच्या अतिक्रमण विभागासमोर आव्हान ठाकले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांनी घरासमोर विविध टपऱ्या, स्लॅब तसेच भर रस्त्यावर ओटे बांधून घेतले असले तरी याकडे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे लक्ष जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अयोध्यानगरी परिसरात दाट लोकवस्ती असून या ठिकाणी राहणाऱ्या बंगलेधारकांनी बंगल्याच्या बाहेरील बाजूस असलेल्या विद्युत पोलभोवती, तर कोणी भर रस्त्यावर सीमेंटचे ओटे घालून अतिक्रमण केले आहे. परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून काही नागरिक घरासमोर असलेल्या मोकळ्या जागेत बिनधास्तपणे पक्के बांधकाम करून अतिक्रमण करत असले तरी याकडे पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे लक्ष वेधले जात नसल्याची तक्रार परिसरातीलच नागरिकांनी केली आहे. दरम्यान, या अतिक्रमणाबाबत परिसरातील काही नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे तक्रारदेखील केली आहे. (वार्ताहर)
अतिक्रमणाकडे पालिकेचे दुर्लक्ष
By admin | Published: November 21, 2015 11:49 PM