दिंडोरी : तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये गेल्या तीन दिवसांपासून वरुणराजाने हजेरी लावण्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, पेरणी केलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा भीजपाऊस पडत असल्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. दडी मारलेल्या पावसाने तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी हैराण झाले होते. मात्र, सध्या पावसाचे आगमन झाल्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागात भात आवणीच्या कामाला मोठा वेग आला आहे.भात आवणी करताना गाळ करण्यासाठी चांगल्या पावसाची आवश्यकता असते; परंतु सध्या पावसाचे उशिरा आगमन झाल्यामुळे तसेच भाताचे रोप जास्त दिवसाची झाल्यामुळे बळीराजाने जास्त पावसाची वाट न पाहता कमी पावसावर भात आवणीला प्रांरभ केला आहे.दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी भात पिकाकडे व्यापारी दृष्टिकोन ठेवून सध्या भातशेती करीत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी शेतकरी ज्या जातीच्या तांदळाला बाजारात जास्त मागणी आहे, अशा जातीची भात बियाणे खरेदी करून रोप टाकत आहेत. यात इंद्रायणी, कोळपी, दप्तरी, भोगावती, महालक्ष्मी, लालकोर आशा विविध जातींची बियाणे वापरली जातात.गेल्या तीन ते चार वर्षांपासून या परिसरातील भात उत्पादक शेतकऱ्यांनी इंद्रायणी जातीच्या भाताला मोठ्या प्रमाणात पसंती दिल्याचे दिसून येत आहे. या भागातील शेतकरी भात शेतीसाठी कुंडी वाफा, दलदल वाफा, जमीन पायरी टप्प्यात वाफा पद्धतीने भात शेती लागवड करीत आहेत. यासाठी संततधार पावसाची खूप गरज असते.दिंडोरीच्या पश्चिम पट्ट्यात अशा स्वरूपाचा पाऊस कायमच पडत असल्यामुळे भात पिकाला पोषक वातावरण निर्माण होत असल्यामुळे या परिसराला भाताची नगरी म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. (२१ दिंडोरी)
संततधार पावसामुळे शेतकरी समाधानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 01:21 IST
दिंडोरी : तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये गेल्या तीन दिवसांपासून वरुणराजाने हजेरी लावण्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, पेरणी केलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.
संततधार पावसामुळे शेतकरी समाधानी
ठळक मुद्देदिंडोरी तालुक्यातील पश्चिम भागात भात आवणीला सुरुवात