नाशिक : राज्य सरकारकडे पैसे नाहीत आणि महापालिकेला नवीन रस्त्यांचा बोझा परवडणारा नसल्यामुळे नाशिक ते नाशिकरोड दरम्यान होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी द्वारका ते नाशिकरोड रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गावर थेट उड्डाणपूल बांधण्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली. नाशिक शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण, नवीन उड्डाणपुलाची निर्मिती व विविध रस्त्यांच्या बळकटीकरणाच्या कामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. येथील के. के. वाघ महाविद्यालयाच्या प्रांगणात या कामांच्या कोनशिलेचे अनावरण नितीन गडकरी यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. ते पुढे म्हणाले, देशातील रस्ते अपघाताला रोड इंजिनिअरिंग जबाबदार असून, त्यातून दरवर्षी लाखो लोक मृत्युमुखी पडत आहेत ते टाळण्यासाठी देशात अपघात होणारी ठिकाणे शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या आहेत. त्याचबरोबर देशात ९६ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते रूंदीकरण करण्याचे ठरले होते, आता तेच दोन लाख किलोमीटरपर्यंत वाढविण्यात येणार आहेत. देशात बारा एक्स्प्रेस हायवे करण्यात येणार असल्याने त्याचा फायदा दिल्लीसह अन्य राज्यांना होऊन प्रदूषणमुक्ती व वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. देशात रस्ते उभारणीसाठी पैशांची कमतरता पडू देणार नाही, असे सांगून गडकरी यांनी आपल्या खात्याचे बजेट ५५ हजार कोटीचे असले तरी, मला २५ लाख कोटी रुपयांचे काम करायचे आहे. देशात लवकरच बारा ठिकाणी वॉटर पोर्ट तयार करण्यात येत असून, त्यामुळे पाण्यावरून उड्डाण केलेले विमान कोणत्याही विमानतळावर उतरू शकेल. पाण्यावर व रस्त्यावरही चालणारी मोटार आपण अमेरिकेतून विकत घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. विकास करण्यासाठी पैशांची नव्हे तर इच्छाशक्तीची गरज असल्याचे सांगून, नाशिक हे प्रगतिशील शहर असून, येथील शेतकरीही प्रगतिशील आहे, त्यामुळे या शहराच्या गरजा पूर्ण करण्यास आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही गडकरी यांनी दिली. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, हेमंत गोडसे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य महाव्यवस्थापक अतुलकुमार यांनी केले.
गडकरी यांची घोषणा : कोट्यवधींच्या रस्ते कामांचे भूमिपूजन
By admin | Published: November 05, 2016 11:59 PM