नाशिक : गेल्या नऊ महिन्यांपासून राज्य सरकारच्या दरबारात भिजत पडलेला नाशिक महापालिकेचा शहर विकास आराखडा व विकास नियंत्रण नियमावलीवर अखेर मंगळवारी (दि. ३) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वाक्षरी झाल्याचे वृत्त असून, त्यासंबंधी अधिकृत अधिसूचना दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. विकास आराखड्यातील बदलासंबंधी आता विकसकांसह नाशिककरांचे लक्ष लागून राहणार आहे. महापालिकेचा नवीन विकास आराखडा तयार करण्याचे काम २०१३ मध्ये सुरू करण्यात आले होते. तत्कालीन नगररचना सहायक संचालक सुलेखा वैजापूरकर यांनी आराखडा तयार करण्यापूर्वीच तो फुटल्याने मोठ्या प्रमाणावर आरोप झाले. शेतकऱ्यांच्या जमिनींवर आरक्षण टाकत बिल्डरांच्या जमिनींना संरक्षण दिल्याचे आरोप होऊन वातावरण तापले आणि शेतकऱ्यांकडून त्यास तीव्र स्वरूपात विरोध झाला. त्यानंतर महासभेने सदर आराखडा फेटाळून लावला. दरम्यान, तत्कालीन कॉँग्रेस आघाडी सरकारने वादग्रस्त ठरलेला विकास आराखडा रद्द करत नवीन विकास आराखडा तयार करण्यासाठी नगररचनाचे सहायक संचालक प्रकाश भुक्ते यांना नियुक्त केले. भुक्ते यांनी वेळेत आराखडा तयार करत २३ मे २०१५ रोजी त्याचे प्रारूप घोषित केले. त्यानंतर त्यावर २१४९ हरकतींचा पाऊस पडला होता. हरकतींवर सुनावणी होऊन नंतर भुक्ते यांनी सदर विकास आराखडा राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. तेव्हापासून अंतिम विकास आराखड्याच्या मंजुरीकडे नाशिककरांचे लक्ष लागून होते. मध्यंतरी नाशिकचे राष्ट्रवादीचे आमदार जयवंत जाधव यांनी विकास आराखडा जाहीर होत नसल्याबाबत विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी लवकरच आराखडा जाहीर करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु, त्यानंतरही आराखडा जाहीर होण्यास विलंब लागत गेला. बांधकाम व्यावसायिकांत चर्चाविकास आराखड्यावर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्याची चर्चा शहरात बांधकाम व्यावसायिकांमध्ये सुरू होती; परंतु खात्रीलायक माहिती कुणीही देऊ शकत नव्हते. या विकास आराखड्यात आता नेमके काय दडले आहे अथवा काय बदल झाला आहे, याची उत्सुकता ताणली गेली आहे. प्रामुख्याने, कपाट व अन्य बांधकाम परवानग्यांबाबतचा प्रश्न सुटण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. महिनाभरापूर्वी नगरपालिका निवडणुकीनिमित्त नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांना शहरातील बांधकाम व्यावसायिकांच्या संघटना पदाधिकाऱ्यांनी विकास आराखडा मंजुरीबाबत साकडे घातले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी दहा दिवसांत आराखडा जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यासही विलंब होत असल्याने आराखड्याबाबत अस्वस्थता वाढत गेली. दरम्यान, मंगळवारी दुपारी अखेर विकास आराखड्यावर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
विकास आराखड्याला अखेर शासनाची मंजुरी?
By admin | Published: January 04, 2017 12:20 AM