न्यायडोंगरी : नेहमी कोणत्या न कोणत्या कारणाने वादग्रस्त ठरणारी न्यायडोंगरी ग्रामपालिकेची ग्रामसभा गावातील महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करून शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन ठराव संमत करण्यात आले.सरपंच गायत्री मोरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या ग्रामसभेत प्रामुख्याने गावातील दारू, मटका, जुगार असे अवैध धंदे बंद करण्यात यावे, दारिद्र्यरेषेचा नवीन सर्व्हे करण्यात यावा, अन्नसुरक्षा योजनेत अनेक धनवान लोकांचा समावेश आहे, यात गरजू लाभार्थी राहिले असून, त्यांचाही समावेश करण्यात यावा, चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून जलशुद्धिकरण उपकरण बसविणे तसेच गावाच्या महत्त्वाच्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविणे अशा महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली, तर जालम अहेर यांनी नैसिर्गक आपत्तीमुळे नुकसान होणाऱ्या शेतपिकांची भरपाई देताना यापुढे कापूस पिकास भरपाई मिळणार नसल्याचे सांगत या भागात कापूस उत्पादक शेतकरी अधिक प्रमाणात आहे, असे शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही. तेव्हा कापूस पिकाची नुकसान भरपाईचा समावेश शेतपिकात करण्यात यावा, तसा ठराव पारित करून प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. मागील गारपिटीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजूनही भरपाईची रक्कम मिळालेली नाही. ती त्वरित मिळावी, असा ठरावदेखील करण्यात आला. समिती स्थापनासंदर्भात विजय अहेर यांनी चर्चा केली असता दक्षता समिती गठीत करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. मतदार यादीचे ग्रामसभेत वाचन करण्यात यावे, तसेच ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, महाराष्ट्र शासनाचे उपसचिव संजय बनकर यांनी पाठविलेल्या परिपत्रकाचे वाचन ग्रामसभेत का केले नाही, बाबत जगन पाटील यांनी विचारणा केली असता, बीडीओकडूनच सदर परिपत्रक प्राप्त झाले नसल्याचे ग्रामसेवक मोहिते यांनी सांगितले. यावेळी असंख्य नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)
न्यायडोंगरी येथील ग्रामसभा खेळीमेळीत
By admin | Published: January 31, 2016 10:13 PM