अझहर शेख / आॅनलाइन लोकमत
नाशिक, दि. 3 - निसर्गाची जवळून ओळख व्हावी, निसर्गामधील वनऔषधींचा अमुल्य ठेवा जाणून घेता यावा आणि निसर्गाचे महत्त्व लक्षात यावे, यासाठी नाशिक शहरासह जिल्ह्यात पर्यावरणाचे काम करणाऱ्या आपलं पर्यावरण संस्थेने आगळा उपक्रम सुरू केला आहे, तो म्हणजे ‘पर्यावरण शाळेचा’. दर पंधरा दिवसांनी त्र्यंबके श्वर, पेठ तालुक्यातील आदिवासी पाड्यांवर पर्यावरण शाळेची घंटा वाजते. या शाळेत वैद्यांच्या चमुकडून वनऔषधींचे धडे शहरी भागातील वृक्षप्रेमी महिला, पुरूष घेतात.
मागील चाळीस वर्षांपासून वनौषधींद्वारे निसर्गोपचार करणारे खोरीपाडा येथील ज्येष्ठ वैद्य शंकर शिंदे, पांडूरंग आवारी, पेठ तालुक्यातील कुंबाळे पाड्यावरील गोविंद सातपुते, परशुराम गायकवाड, निवृत्ती आवारे यांनी या सदस्यांना जंगलाची भ्रमंती घडवत वनौषधींची ओळख करून दिली. नाशिक जिल्ह्याला आदिवासी भाग लाभला आहे. येथील बहुतांश वैद्य हे निसर्गोपचार करत माणसांबरोबरच जनावरांचाही आजार वन औषधींच्या माध्यमातून बरा करत आले आहेत. त्यांचा वन औषधीद्वारे विविध आजारांवर निसर्गोपचाराचा अनुभव, विविध औषधी वृक्ष, वेली, फुलांची असलेली माहितीची देवाणघेवाण पर्यावरण शाळेच्या माध्यमातून होत आहे. या उपक्रमामुळे तरुणाईला निसर्गाचे महत्त्व पटवून देता येत असून वनऔषधींचा ठेवाही जाणून घेता येत आहे. वनऔषधी व त्यांचा विविध आजारांवर होणारा फायदा आणि त्याविषयीची असलेली माहिती ज्येष्ठ वैद्यांकडून जाणून घेताना वृक्षप्रेमी तरुण अवाक् झाले. जास्त शिक्षण नसतानाही वैद्यांकडे असलेला वनऔषधी व उपचाराच्या माहितीचा खजिना पर्यावरण शाळेत रिता होत असताना सर्वच सहभागी वृक्षप्रेमींच्या भुवया उंचावल्या होत्या.
शहरापासून ५५ किलोमीटरवर असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खोरीपाडा येथे पर्यावरण शाळेच्या पहिला वर्ग उत्साहात पार पडला. या वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे संस्थेचे अध्यक्ष पर्यावरणप्रेमी शेखर गायकवाड यांनी सांगितले. वैद्यांकडे वनौषधी व त्याचे गुणधर्मांविषयीचे प्रचंड ज्ञान असून अनुभवाने त्यांनी ते मिळविले आहे. या ज्ञानाचा फायदा आजच्या शिकलेल्या आधुनिक युगातील पिढीला व्हावा आणि निसर्गातील वनौषधींची जोपसना उत्तरोत्तर होत जावी, या उद्देशाने ‘पर्यावरण शाळा’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. आपलं पर्यावरण संस्थेने यासाठी पुढाकार घेत व्हॉट्स अॅप ग्रुपच्या माध्यमातून सदर संकल्पना संस्थेशी जोडलेल्या शेकडो सदस्यांपर्यंत पोहचविली आहे. यापैकी ज्यांना निसर्ग जाणून घेण्याची आवड आहे, अशा सदस्यांनी नोंदणी करत सहभागी होत आहेत. प्रत्येक वर्गाला पंधरा सदस्यांची मर्यादा ठेवण्यात आली आहे.