नामदेव भोर नाशिकडॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य औषधोपचार, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि मानसिक प्रसन्नता या चतु:सूत्रीच्या आधारे मधुमेहावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यासह आहार तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा असून, संतुलित आहार घेतल्यास ८० ते ९० टक्क्यांपर्यंत नियंत्रण मिळविणे शक्य असल्याचे मत आहारतज्ज्ञ व्यक्त करतात. वाढते शहरीकरण, प्रदूषण आणि बदलती खाद्यसंस्कृती यामुळे मधुमेहाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, देशातील मधुमेहाच्या रुग्णांचे प्रमाण ७० ते ८० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे जवळपास प्रत्येक घरात मधुमेहाचा रुग्ण समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सभोवतालच्या वातावरणाचा परिणाम खाद्यपदार्थांवर होतो. त्यामुळे उघड्यावर उभ्याने खाल्लेल्या पदार्थांचा दुष्परिणाम आरोग्यावर निश्चितच होत असतो. अशा अन्नपदार्थांमधील दोषातून शारीरिक रोग निर्माण होतात. आहारात पथ्ये पाळल्यास उष्णता कमी होते. वेगवेगळ्या वनस्पतींचे मिश्रण केलेली उटणी, आयुर्वेदिक धूप हे मधुमेह नियंत्रणावरील प्रभावी उपाय आहेत. पचन व्यवस्था, हृदयविकार, मूत्रपिंड अशा वेगवेगळ्या संस्थांवर मधुमेहाचा दुष्परिणाम होत असल्याने त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. स्त्रियांच्या मानसिकतेचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे मन प्रसन्न ठेवले पाहिजे. आपल्या प्रकृतीनुसार आहार निश्चित करणे आवश्यक आहे, असा सल्ला आहारतज्ज्ञांकडून दिला जातो.
मधुमेह आजाराचे वाढते प्रमाण चिंताजनक
By admin | Published: November 14, 2016 1:26 AM