नाशिक : गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपये चलनातून बाद केल्यानंतर देशासह शहरात नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. आपल्या जवळ असणारे पैसे खात्यात जमा करण्यासाठी तसेच दैनंदिन वापरासाठी पैसे जवळ बाळगण्यासाठी नागरिकांनी शहरातील विविध बँकांबाहेर गर्दी केल्याचे चित्र आहे.बँकेत आपल्या जवळील पैसे नवीन चलानाप्रमाणे बदलून मिळत असले तरी सुट्या पैशांअभावी मात्र नागरिकांची कुचंबणा होत आहे. ऐन वेतन मिळण्याच्या दिवसातच हा निर्णय जाहीर करण्यात आल्याने कामगार वर्गामध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. किराणा दुकानदार, दूधवाला तसेच इतर दैनंदिन खर्चासाठी पैसे काढण्यासाठी नागरिकांनी एटीएम केंद्र तसेच बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. दैनंदिन जीवनात आवश्यक मोबाइलचे रिचार्ज, वीज बिलाचा भरणा, टीव्हीचे रिचार्ज, टेलिफोन बिल भरण्यासाठी नागरिकांची मोठी कसरत होत असतानाच अनेक ग्राहकांनी सुट्या पैशांअभावी इंटरनेटद्वारे भरणा करण्यास प्राधान्य दिले तर काही नागरिकांना मात्र यानिमित्ताने इंटरनेट बँकिंग किती आवश्यक आहे, हे अधोरेखित झाले.बाजारपेठेत सुटे पैसेच उपलब्ध होत नसल्याने अनेक दुकानदारही सुटे पैसे देण्यासाठी असमर्थ ठरत आहेत. या जाचाला कंटाळून अनेक मोबाइल ग्राहकांनी इंटरनेट बँकिंगद्वारे तसेच डेबिट कार्ड - के्रडीट कार्डचा वापर करून रखडलेले मोबाइल बिल भरले तसेच आपले मोबाइल रिचार्ज केले. वीज बिल भरणा किंवा मोबाइल बिल भरणाप्रमाणे अनेक पेट्रोलपंपांवरही डेबिट किंवा क्रेडीट कार्ड स्वॅप करून पेट्रोल भरणा करण्यात येत होता. शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदी करण्यासाठी आलेला ग्राहक वर्गालादेखील सुट्या पैशांच्या अभूतपूर्व चणचणीमुळे ज्या दुकानांमध्ये बँकेचे कार्ड व्यवहारासाठी स्वीकारले जात होते अशा दुकानांमध्ये खरेदी करावी लागत होती. ई-व्यवहाराचे महत्त्व अधोरेखित होऊ लागले आहे आणि यामुळेच भविष्यात ‘कॅश लेस’ व्यवहार करणेदेखील सोयीचे होणार आहे. (प्रतिनिधी)
इंटरनेट बँकिंगचा वापर वाढला
By admin | Published: November 14, 2016 1:49 AM