नाशिक : भागवत धर्माची ध्वजपताका देशभर फडकविणाऱ्या संत नामदेव महाराजांच्या विचारांचा जागर त्यांच्याच जयंतीदिनी राज्यभरातील शिंपी समाजबांधवांनी घडवून आणला. श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजाच्या अखिल भारतीय मध्यवर्ती संस्थेच्या वतीने शहरातून प्रथमच मोठ्या स्वरूपात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. शोभायात्रेत हजारो शिंपी समाजबांधव सहभागी झाले होते.संत नामदेव महाराजांची जयंती यंदा दिमाखात आणि वेगळ्या स्वरूपात साजरी करण्याचे नियोजन मध्यवर्ती संस्थेने केले. सकाळी ९ वाजता गोदाघाटावरील गोदावरी पटांगणापासून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत लहान मुलांनी विठ्ठल-रखुमाई तसेच संत नामदेवांच्या वेशभूषा साकारत सहभाग नोंदविला शिवाय गुलालवाडी व्यायामशाळेचे ढोलपथक, बॅँडपथक तसेच काकडे महाराजांचे भजनी मंडळ यांनीही सहभागी होत नाशिककरांचे लक्ष वेधले. संत नामदेव महाराजांचा नामघोष करत निघालेली ही शोभायात्रा मालेगाव स्टॅण्ड, होळकर पूल, रविवार कारंजा, महाबळ चौक, मेहेर, सीबीएस, मोडक सिग्नल, गडकरी चौक, मुंबईनाका मार्गे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात जाऊन पोहोचली. शोभायात्रेच्या मार्गावर आमदार सीमा हिरे, उपमहापौर गुरुमित बग्गा, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी महापौर यतिन वाघ यांनी संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करत अभिवादन केले. शोभायात्रेत संत नामदेव महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. अतिशय शिस्तबद्धपणे निघालेली ही शोभायात्रा गायकवाड सभागृहात विसर्जित झाली. त्यानंतर गायकवाड सभागृहात ‘जागर सद्विचारांचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कौटुंबिक समस्यांवर सीमा सोनवणे, शिक्षणावर डॉ. मनोज शिंपी, संघटन कौशल्यावर राजेश खैरनार तर मध्यवर्ती संस्थेचे व्हिजन या विषयावर लोकमतचे मुख्य उपसंपादक धनंजय वाखारे यांनी विवेचन केले. प्रास्ताविक मध्यवर्ती संस्थेचे उपाध्यक्ष सुनील (बापू) निकुंभ यांनी केले. सूत्रसंचालन सचिन जाधव यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष विजयनाना बिरारी यांनी आभार मानले. महाप्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. (प्रतिनिधी)
शिंपी समाजबांधवांतर्फे सद्विचारांचा जागर
By admin | Published: November 12, 2016 12:51 AM