पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी, मांदाणे, अंबानेर, जिरवाडे, चामदरी, गोलदरी परिसरात बिबट्याचा वाढता वावर पाहता वनविभाग अजून किती गुरे, शेळ्या व मनुष्यांच्या हाणीची वाट पाहात आहे, असा सवाल परिसरातून विचारला जात आहे.रविवारी दुपारच्या सुमारास बिबट्याने अंबानेर येथील रामदास पोपट महाले यांच्या गायीला भक्ष्य बनविण्यासाठी तिचा पाठलाग केला. परंतु परिसरातील शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे गायीचा जीव बचावला. बिबट्याने मांदाणे शिवारात धूम ठोकली. परिसरात पिंजरा लावण्याची मागणी करूनसुद्धा वनविभाग मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.काही महिन्यांपूर्वी जुन्या पुनेगाव रस्तालगत असलेल्या सुधाकर एकनाथ कड या शेतकऱ्याचे संकरीत वासरू बिबट्याने फस्त केले होते व दोन गायींचा पाठलाग केला असता त्या गायी अंबानेर येथील विठ्ठल गायकवाड यांच्या विहिरीत पडल्याने गायींचा जीव वाचला. तेव्हासुद्धा वनविभागाने आम्ही पिंजरा लावला आहे. अशी उडवाउडवीची उत्तरे देत ज्या जंगलात हिंस्रप्राण्याचा वावर आहे, अशा ठिकाणी मनुष्याचा वावर वाढल्याने बिबट्यांचा हल्ल्यात वाढ झाल्याचे वनअधिकारी सांगत असल्याने सामान्य नागरिकांनी न्याय मागायचा तरी कुणाकडे, असा सवाल परिसरातील ग्रामस्थकडून विचारला जात आहे.अस्वलीपाडाचे आदिवासी शेतकरी व अहिवंतवाडीचे उपसरपंच शिवाजी पोपट गावित यांच्या पांडाणे शिवारातील गट नंबर २२मध्ये पहाटे पाचच्या सुमारास बिबट्याने दोन शेळ्या फस्त केल्या होत्या. अधिकारी येतात, पंचनामा करतात. परंतु बिबट्याचा बंदोबस्त करत नाहीत. बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर )
अहिवंतवाडी परिसरात बिबट्याचे पुन्हा दर्शन
By admin | Published: January 31, 2016 10:41 PM