मनमाड : काळे धन बाहेर काढण्यासाठी सरकारने अचानक पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कुठेही या नोटा स्वीकारल्या जाणार नसल्या तरी रेल्वे बुकिंगसाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या नोटा चलनात आणण्यासाठी लांब पल्ल्याच्या वातानुकूलित आरक्षित रेल्वे तिकिटांचा आधार घेऊन नंतर रद्द केले जाण्याची शक्यता असल्याने अशा संशयित व्यक्तींवर रेल्वे प्रशासनाने बारीक लक्ष ठेवले असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. मनमाड जंक्शन रेल्वेस्थानकावर देशाच्या विविध भागातून प्रवासी गाड्या येत असतात. ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द झाल्याच्या निर्णयामुळे मनमाड रेल्वेस्थानकावर गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे. अचानक घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे अवैध मार्गाने पैसे गोळा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. सदर नोटा बदलून घेण्यासाठी ओळखपत्र सक्तीचे करण्यात आले असल्याने सर्व व्यवहार पारदर्शक होणार आहे. सर्व बँका बंद असल्या तरी रेल्वेसह अन्य काही ठिकाणी तीन दिवस या नोटा स्वीकारल्या जाणार आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असला तरी याचा दुरूपयोग काही महाभागांकडून बेहिशोबी नोटा चलनात आणण्यासाठी केला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. संपूर्ण कुटुंबाचे लांब पल्ल्याचे वातानुकूलित डब्याचे वेटिंगमधील तिकीट आरक्षित करून पाचशे किंवा हजार रु पयांच्या नोटांचे लाखो रु पये रेल्वेकडे जमा करायचे व दोन चार दिवसानंतर प्रवास रद्द झाला सांगून आरक्षित तिकीट रद्द करायचे व परतावा मध्ये रेल्वेकडून अल्पशी वजावट जाता शंभर रु पयांच्या नोटांचे लाखो रुपये घ्यायचे असे प्रकार घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अशा संशयित व्यक्तींवर रेल्वे प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. (वार्ताहर)
मनमाड : पाचशे, हजारच्या नोटा रद्द झाल्याने रेल्वेस्थानकावर गोंधळ
By admin | Published: November 09, 2016 11:23 PM