नायगाव : अतिरिक्त कार्यभार नाकारण्याचा निर्णय तलाठी संघटनेने घेतल्यामुळे नायगाव येथील तलाठी कार्यालय महिनाभरापासून ‘सील’ करण्यात आले आहे. तलाठी कार्यालय बंद असल्यामुळे नायगाव सजात समाविष्ट असलेल्या गावांतील शेतकऱ्यांना हेलपाटे मारण्याची ‘सजा’ भोगावी लागत आहे.नायगावसह जोगलटेंभी, सोनगिरी, ब्राह्मणवाडे या गावांचा नायगाव सजात समावेश होतो. त्यामुळे शेतजमिनीसंदर्भातील कामांसाठी या चारही गावांतील शेतकऱ्यांची येथील तलाठी कार्यालयात नियमित वर्दळ असते. गेल्या काही वर्षांपासून पूर्णवेळ तलाठ्याची नेमणूक न करता अतिरिक्त कार्यभार म्हणून नायगावची जबाबदारी इतर सजातील तलाठ्यांवर सोपविण्यात येत असल्यामुळे व वारंवार तलाठ्यांच्या बदल्या होत असल्याने आधीच शेतकऱ्यांची कामे वेळेत होत नव्हती. त्यातच आॅगस्ट महिन्यात बारागावपिंप्री व वडांगळी या दोन सजांमधील सहा गावांचा कारभार असलेल्या एस. पी. गोराणे यांच्याकडे नायगाव सजातील चार गावांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. सुमारे ५० किलोमीटर अंतरावरील तीन सजातील दहा गावांचा कारभार सांभाळताना गोराणे यांची चांगलीच दमछाक होत होती. शिवाय पंधरा-वीस दिवसांनंतर एकेका सजातील तलाठी कार्यालया उघडले जात होती. परिणामी, मोठ्या प्रमाणात कामे खोळंबून राहत होत असल्याने तलाठ्यांना शेतकऱ्यांच्या संतापाला सामोरे जावे लागत होते.दरम्यान, महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेने अतिरिक्त पदभार असलेल्या सजांचा कार्यभार नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तलाठी गोराणे यांनी गेल्या महिन्यातच नायगाव तलाठी कार्यालय सील करुन त्याची चावी तहसील कार्यालयात जमा केली आहे. त्यामुळे महिनाभरापासून नायगाव सजातील शेतकऱ्यांची कामे अडून पडली असल्याने संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
महिन्यापासून नायगाव तलाठी कार्यालय ‘सील’
By admin | Published: November 12, 2016 10:56 PM