संजय पाठक, नाशिक: सलग चौथ्यांदा निवडणूक लढवणाऱ्या शिंदे सेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांची अवस्था बिकट होत चालली असून नवव्या फेरी अखेरीस उध्दव सेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी १ लाख ३ हजार मतांची आघाडी घेतल्याने त्यांच्या पक्षात जल्लोष सुरू झाला आहे. २०१४ मध्ये राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि २०१९ मध्ये राष्ट्रवादीचेच समिर भुजबळ यांना अनुक्रमे १ लाख ८७ हजार आणि २ लाख ९२ हजार मतांनी हेमंत गोडसे यांनी पराभूत करून ते जायंट किलर ठरले होते. यंदा हॅट्रीक मिळवण्यासाठी त्यांनी कंबर कसली होती.
शिंदे सेनेने त्यांच्या उमेदवारीसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न केला होता. दरम्यान, उध्दव सेनेने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देऊन अचूक निर्णय घेतला तो पथ्यावर पडला आहे. गोडसे यांची उमेदवारी उशिरा घोषित झाल्याने वाजे यांनी सुरूवातीपासून आघाडी घेतली होती आणि त्याचेच फलीत आता दिसत आहे. राजाभाऊ वाजे यांनी एक लाखाहून अधिक मतांचा लीड घेतल्याने उध्दव सेनेच्या कार्यालयात जल्लोष सुरू झाला आहे.