नाशिक : मंत्रिमंडळातील कोणत्याही सहकाऱ्यांना कल्पना न देता रातोरात नोटाबंदीचा निर्णय घेण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आर्थिक घोटाळा होता. कारण त्यांनी ज्या तीन उद्देशांसाठी हा निर्णय घेतला, त्यातील एकही उद्देश सफल झाला नसल्याचा आरोप कॉँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख आमदार भाई जगताप यांनी पत्रकार परिषदेत केला. आमदार भाई जगताप यांनी सांगितले की, आतंकवाद रोखण्यासाठी, काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. मात्र निर्णय घेताना कोणालाही विश्वासात घेतले नाही. शिवाय नोटाबंदी ज्या तीन उद्देशांसाठी जाहीर करण्यात आली होती. ते तीनही कारणे सफल झालेली नाहीत. आतंकवाद्यांकडे बनावट नोटा असल्याने आणि त्यांना तो पुरवठा होत असल्याने त्यांची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला, तर नोटाबंदीच्या दोन दिवसांनंतर आतंकवाद्यांना भारताच्या लष्कराने कंठस्नान घातल्यानंतर त्यांच्याकडे नवीन दोन हजारांच्या बनावट नोटा सापडल्या. म्हणजे बनावट नोटा छापणे सुरूच राहिले. त्याचप्रमाणे काळापैसा बाहेर येण्यासाठी हा निर्णय जाहीर करण्यात आला, तर देशातील बॅँकांमध्ये ५० दिवसांत जे काही १४ लाख ९० हजार कोटी जमा झाले. त्यातील किती काळा पैशांची रक्कम आहे. हे सरकार जाहीर करत नाही. शिवाय भ्रष्टाचार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला तर ज्या काही ४२ घटनांमध्ये ६४९ कोटींच्या नोटा जप्त करण्यात आल्या. (पान ५ वर) त्यापैकी सर्वाधिक नोटा या भाजपा नेते, कार्यकर्ते आणि मंत्र्यांकडे सापडल्या. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे ९८ लाख, तर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे कोट्यवधी रुपये सापडले. तसेच रिझर्व्ह बॅँक आणि स्टेट बॅँकेच्या अनेक अधिकाऱ्यांवर कारवाईची वेळ आली आहे. मग, भ्रष्टाचार थांबला असे म्हणणे चुकीचे ठरेल. त्यामुळे कॉँग्रेसने या नोटाबंदी विरोधात देशभर आंदोलनाची तयारी केली आहे. त्यानुसार ६ जानेवारीला राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल. ८ जानेवारीला चौकाचौकांत विविध चौकसभा घेण्यात येईल आणि ११ जानेवारीला दिल्लीत देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी निरीक्षक उल्हास पाटील, प्रभारी अविनाश रामेष्ठी, डॉ. शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील, राजाराम पानगव्हाणे, शरद अहेर, नगरसेवक लक्ष्मण जायभावे, राहुल दिवे, दिगंबर गिते, अॅड. आकाश छाजेड, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, वत्सला खैरे, सुरेश मारू, पांडुरंग बोडके आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)
नोटबंदी म्हणजे पंतप्रधानांचा घोटाळा
By admin | Published: January 03, 2017 1:59 AM