लासलगाव : येथील मुख्य आवारावरील कांदा व धान्य तसेच विंचूर व निफाड उपबाजार आवारावरील धान्य शेतमालाचे लिलाव व्यापाऱ्यांनी चलन उपलब्धता नसल्याने सहभागी होणार नाही, असे पत्र व्यापारी संघटनांनी दिल्याने पुढील सूचना येईपर्यंत लिलाव बेमुदत बंद राहणार आहेत. मात्र लासलगाव येथील भाजीपाला तसेच निफाड उपबाजार आवारावरील कांदा लिलाव होणार असल्याची माहिती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी दिली.कृषी उत्पन्न बाजार समितीचे चलन पुरवठा होण्यासाठी अडचण निर्माण झाली. यामुळे व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी होणार नसल्याचे लासलगाव येथील मर्चंट्स असोसिएशनने कळविले. त्यामुळे मंगळवारपर्यंत शेतमालाचे लिलाव बंद होते. परंतु सोमवारी सायंकाळी दिलेल्या पत्रानुसार आता बेमुदत लिलाव बंद राहणार आहेत. त्यामुळे शेतकरवर्गात चिंतेचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्याची घोषणा केल्याने त्याचे पडसादही उमटायला सुरु वात झाली आहे. या निर्णयामुळे गुरुवार ते मंगळवारपर्यंत लिलाव बंद राहिले आहेत. (वार्ताहर)
कांदा लिलाव बेमुदत बंद
By admin | Published: November 15, 2016 1:40 AM