पाथर्डी फाटा : रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णाची सामाजिक, आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्याच्या नातेवाइकांशी योग्य तो सुसंवाद साधल्यास डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील तणाव कमी होऊन सलोख्याचे संबंध निर्माण होतील. यासाठी डॉक्टरांनाच पुढाकार घ्यावा लागेल, असे प्रतिपादन मुंबई येथील अतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू रॉय यांनी केले. इंडियन सोसायटी आॅफ क्रिटिकल केअर मेडिसिन संस्थेच्या वतीने पाथर्डी फाटा येथील हॉटेल एक्स्प्रेस इन येथे आयोजित केलेल्या तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या समारोपप्रसंगी रॉय बोलत होते. व्यासपीठावर अॅड. अविनाश भिडे, डॉ. हितेश भट उपस्थित होते. संघटनेच्या वतीने ‘मर्यादित साधन सुविधा व सर्वोत्कृष्ट उपचार पद्धती’ या विषयावर तीन दिवसीय परिषदेचे आयोजन केले होते. ‘वैद्यकीय व्यवसाय, समाज व कायदा’ या विषयावर मान्यवरांनी विचार मांडले. रॉय यावेळी म्हणाले, भारतातील कायदे डॉक्टर्सच्या बाजूने असल्याने त्यांनी न घाबरता आत्मविश्वासाने आपला व्यवसाय केला पाहिजे; मात्र कोणत्याही परिस्थितीत रुग्णाचा वैद्यकीय अहवाल, नोंदी, शवविच्छेदन अहवाल यात फेरफार करू नये, रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच डॉक्टर्स यांच्यातील संघर्षाच्या वेळी कायदेशीर प्रक्रियेसाठी वरील कागदपत्रांना मोठे महत्त्व असते हे लक्षात घेतले पाहिजे, असेही रॉय म्हणाले. यावेळी अॅड. भिडे यांनी डॉक्टरांना दैनंदिन कामकाजात येणाऱ्या अडचणी, कायदा आणि उपाय याविषयी परिसंवादात सहभाग घेत मार्गदर्शन केले. डॉक्टरांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे यावेळी मान्यवरांनी दिली. या परिषदेमध्ये चर्चासत्रे, परिसंवाद झाले. यासाठी अनेक तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. राज्यभरातून सुमारे आठशे प्रतिनिधी उपस्थित होते. परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ. यतीन दुबे, डॉ. पंकज राणे, डॉ. दिनेश वाघ, डॉ. किरण बिरारी यांनी परिश्रम घेतले.
...तरच रुग्ण, डॉक्टरांमधील संबंध सुधारतील
By admin | Published: November 22, 2015 11:52 PM