नाशिक : जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागू होण्यास अवघ्या काही दिवसांचा कालावधी उरल्याने जिल्हा परिषदेत बैठकांचा रतीब घातला जात असल्याची चर्चा आहे. मंगळवारी (दि. ३) अचानक झालेली स्थायी समितीची मासिक बैठक काही मिनिटांतच आटोपण्यात आल्याचे वृत्त आहे. स्थायी समितीची बैठक मंगळवारी दुपारी बोलविण्यात आली होती. बैठकीस अध्यक्ष विजयश्री चुंबळे, सभापती केदा अहेर, शोभा डोखळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, सदस्य शैलेश सूर्यवंशी, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे गटनेते रवींद्र देवरे, शिवसेनेचे गटनेते प्रवीण जाधव यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत बिगर आदिवासी भागातील कामांसाठी निधी उपलब्ध झालेला नसल्याने ही कामे आचारसंहितेत अडकण्याची भीती असून, या कामांना तत्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी शैलेश सूर्यवंशी यांनी केली. त्यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी याबाबत आपण तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करू, असे आश्वासन दिले. त्यानंतर खोबरा बर्फी आणि टेस्टी वडा नास्त्याला देत बैठक आटोपती घेण्यात आल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे उरलेले दोन महिने कोणताही तंटा-बखेडा नको म्हणून पदाधिकारी व प्रशासनाकडून सदस्यांना कुरवाळण्याचे काम सुरू असल्याची चर्चा आहे. मंगळवारी झालेल्या स्थायी समितीची मासिक बैठक गुजराती प्रकारची ‘खोबरा बर्फी आणि टेस्टी वडा’ देऊन काही मिनिटांतच गुंडाळण्यात आली. बैठकीत फारशी चर्चा झाली नसल्याचे विद्यमान सत्ताधारी सदस्यांचे म्हणणे आहे, तर एका गटनेत्याला उशिरा निरोप मिळाल्याने सभागृहात पोहोचेपर्यंत सभा आटोपण्यात आल्याने केवळ खोबरा बर्फी खाऊन तोंड ‘गोड’ करण्याची वेळ या गटनेत्यावर आल्याचे समजते. (प्रतिनिधी)
स्थायीची बैठक गुंडाळली
By admin | Published: January 04, 2017 12:17 AM