सिन्नर : सिन्नर-शिर्डी रस्त्यावर पिकअप जीप व आयशर टेम्पो यांची धडक होऊन झालेल्या अपघातात ठाणे जिल्ह्यातील तीन जण ठार झाले, तर आठ जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. वावी-पांगरी गावांदरम्यान शिंदे वस्तीजवळ शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास सदर अपघात झाला. कोशिंबी, ता. भिवंडी (जि. ठाणे) येथील काही कुटुंबीय देवदर्शनासाठी पिकअप जीपने (क्र. एमएच ०४ जीआर ९१२२) घेऊन शिर्डीच्या दिशेने निघाले होते. समोरून येणारा डाक पार्सलचा आयशर टेम्पो (क्र. एमएच २०, एटी ८६३४) यांच्यात धडक झाली. पिकअप जीपमध्ये १७-१८ प्रवासी असल्याने व गटारीत उलटल्याने अंधारात जखमी महिला व लहान मुले यांचे रडणे व किंकाळ्यांमुळे घटनास्थळी गोंधळ उडाला. अपघातात ज्ञानेश्वर नामदेव ठाकरे (३०), नेहा ज्ञानेश्वर ठाकरे (२७) दोघेही रा. कोशिंबी, ता. भिवंडी या दांपत्यासह योगिता संतोष चौधरी (२५), रा. आडगाव, ता. शहापूर हे ठार झाले, तर अनिल बबन पालवी, अंजना पालवी, राम गणपत सपाट, ज्ञानेश्वर कान्हू शिंदे, उमेश परशुराम ठाकरे, गणेश विष्णू चौधरी, अजय राम सपाट हे जखमी झाले. जखमींवर सिन्नर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. अन्य एक गंभीर जखमी असून, त्यास नाशिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांनी घटनेची माहिती वावी पोलिसांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह हवालदार शिवाजी माळी, संदीप शिंदे, दिलीप जोंधळे, हनुमंत कांबळे, रामदास धुमाळ, रमेश सदगीर यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थ किरण पाटील, इकबाल अत्तार, संतोष घोटेकर, राहुल पठाडे, मयूर कापुरे यांच्या मदतीने जखमींना खासगी रुग्णालयात नेण्यात आले.(वार्ताहर)
पिकअप जीप-आयशर टेम्पो अपघातात तीन ठार
By admin | Published: November 22, 2015 11:33 PM