नाशिक : धरणांमधील पाण्याचे आरक्षण ठरविण्यात आल्यानंतर आता त्याला मंजुरीसाठी पालकमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. यंदा ज्या ज्या यंत्रणांनी पाण्याची मागणी केली, त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार पाण्याचे आरक्षण ठेवण्यात आल्यामुळे प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्यास पालकमंत्र्यांची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये ९८ टक्के पाणीसाठा असल्यामुळे यंदा पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नसली तरी, पिण्याचे वगळून सिंचनासाठीही पाणी आरक्षित ठेवण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी सलग दोन दिवस संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन पाणी आरक्षणावर अंतिम हात फिरविला. पाणी आरक्षणाला मंजुरी देण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना असल्यामुळे व सध्या नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे हा प्रस्ताव थेट पालकमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्याचे ठरविण्यात आले आहे.
पाणी आरक्षणाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव
By admin | Published: November 05, 2016 2:35 AM