नाशिक : नाशिक वनवृत्त अंतर्गत नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांसाठी वनविभागाकडून वनरक्षक पदाच्या ५२ जागा भरल्या जात असून, शनिवारपासून सुरु झालेली भरतीप्रक्रिया रविवारीदेखील सुरुच होती. यासाठी उमेदवारांची चाचणी घेण्यात आली.नाशिकमध्ये शारीरिक पात्रता चाचणीला प्रारंभ झाला असून, त्यात सुमारे २१ हजार १५४ उमेदवारांनी सहभाग नोंदविला आहे. नाशिक, नगर या दोन्ही जिल्ह्यांसाठी भरतीप्रक्रिया राबविली जात असून, सलग दहा दिवस ही प्रक्रिया चालणार आहे. टाकळी रोड, औरंगाबाद-तपोवन लिंक रोड अशा दोन ठिकाणी ही चाचणी शनिवारपासून सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात पाच किलोमीटरपर्यंत धावण्याची चाचणी घेतली जात आहे. शारीरिक चाचणीनंतर निवडप्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली आहे. त्यात विभागात ३२ आणि २० अशा एकूण ५२ जागा आहेत. येत्या १५ तारखेपर्यंत दररोज संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ही चाचणी घेतली जाणार आहे. (प्रतिनिधी)
वनरक्षक पदाची भरतीप्रक्रिया दुसऱ्या दिवशीही सुरू
By admin | Published: November 06, 2016 11:33 PM