लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ग्रामीण भागात वीजनियंत्रणावर लक्ष केंद्रित करण्याकरिता निर्माण करण्यात आलेल्या संनियंत्रकाप्रमाणेच आता महापालिका हद्दीतही समिती गठीत केली जाणार आहे. ग्राहकांना पुरेसी आणि अखंडित वीजसेवा मिळावी यासाठी ही समिती काम करणार असून, महावितरण आणि ग्राहकांमध्ये सुसंवाद वाढावा यासाठी सदर पाऊल उचलण्यात आले आहे. ग्राहकांना उत्तम व दर्जेदार सेवा पुरवण्यासाठी जिल्हा व तालुका स्तराप्रमाणे महापालिका क्षेत्रातही विद्युत वितरण संनियंत्रण समिती गठित करण्यास शासनाने मंजुरीचे परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे शहरी भागातील वीज तक्रारीबाबत ग्राहकांना सुलभ मार्ग उपलब्ध होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. सध्या महावितरणकडे तक्रार करण्यासाठी द्रविडी प्राणायाम करावा लागतो. ही महत्त्वाची अडचण दूर व्हावी, अशी अपेक्षा यानिमित्ताने ग्राहकांनी व्यक्त केली आहे. वीज पुरवठा हा अत्यंत महत्वाची बाब असून महापालिका क्षेत्रात अशा नियंत्रण समित्या गठित केल्या तर ग्राहक व महावितरण यांच्यात सुसंवाद राहील व ग्राहकांच्या समस्या लवकर सोडविण्यात येतील. विद्युत वितरण सनियंत्रण समिती गठित झाल्यावर या समितीच्या बैठका दर तीन महिन्यांनी होतील. बैठकीतील निर्णयांची माहिती शासनाला करावयाच्या शिफारसी संदर्भात मुख्य अभियंत्यामार्फत शासनाला कळविली जाणार आहे. मनपा क्षेत्रातील या समितीचे गठन मनपा आयुक्तांनी करावे. त्यापूर्वी अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीला पालकमंत्र्यांची सहमती घ्यावी. महिनाभरात ही नियुक्ती करावी लागणार आहे. या समितीच्या अध्यक्षपदी विधानसभा सदस्य, सहअध्यक्ष, संबंधित क्षेत्रातील विधानसभा सदस्य व त्या क्षेत्रातील महावितरणचे कार्यकारी अभियंता, सदस्य म्हणून त्या-त्या विधानसभा मतदारसंघातील सर्व झोन सभापती, विधानसभा मतदारसंघातील दहा नगरसेवक, आयुक्त नेमतील ते मनपा अधिकारी, त्या-त्या विधान सभा मतदारसंघातील तहसीलदार या शिवाय उद्योग, शिक्षण व्यावसायिक ग्राहक, घरगुती ग्राहक, वितरण क्षेत्रात उत्कृष्ट काम कारणारी व्यक्ती, ग्राहक हितासाठी काम करणाऱ्या दोन अशासकीय संस्थांचा एक प्रतिनिधी. यांचा समावेश असेल.
वीजप्रश्नावर आता सनियंत्रकाचे लक्ष
By admin | Published: June 27, 2017 12:49 AM