नाशिक : अवैध उत्खनन करून डोंगर पोखरणाऱ्या खनिजमाफियांवर जिल्हा खनिकर्म विभागाने कारवाई करीत ७५ लाखांचा दंड वसूल केला आहे. पर्यावरणाला धोका निर्माण करणाऱ्या ५२ ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पर्यावरणप्रेमींकडून समाधान व्यक्त केले जात असून, अवैध उत्खनन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
जिल्ह्यातील अवैध उत्खनन प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. ब्रम्हगिरी या संरक्षित क्षेत्राबरोबरच संतोषा आणि भागडी येथे सुरू असलेल्या मोठ्या उत्खननामुळे जिल्ह्यातील पर्यावरणाचा कळीचा मुद्दा समोर आला आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी टास्क फोर्स स्थापन करून लागलीच थेट कारवाई देखील केल्याने पर्यवाणप्रेमींकडून स्वागत केले जात आहे. १ एप्रिलपासून जिल्हा खनिकर्म विभागाने ५२ ठिकाणी थेट कारवाई करीत ७५ लाख ७६ हजार रुपायांचा दंड संबंधितांना ठोठावला आहे. मात्र, त्यापैकी ३९ लाख ५७ हजार रुपयेच वसूल करण्यात आले असून, आता दंड वसूल करण्यासाठीची मोहीम देखील राबविली जाणार असल्याचे समजते.
संरक्षित डोंगर क्षेत्र असलेल्या ब्रम्हगिरीतील अवैध उत्खननाचा प्रकार राज्यात चांगलाच गाजला. या प्रकरणाची थेट पर्यावरणमंत्र्यांनी दखल घेतल्याने जिल्ह्यातील अवैध उत्खनन चर्चेत आले आहे. पर्यावरणप्रेमी देखील पुढे आल्यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. या माफियांकडून त्र्यंबकेश्वरमधील ब्रम्हगिरी पर्वतालगत खोदकाम सुरू केले होते. त्यानंतर पर्यावरणप्रेमींच्या रेट्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने टास्क फोर्सची स्थापना केली आहे. टास्क फोर्सच्या पहिल्याच बैठकीत भागडी व व संतोषा डोंगरावर उत्खननास बंदी करण्यात आली. त्यानंतर आता थेट कारवाई सुरू करण्यात आली आहे.
--इन्फो--
दंड भारी; वसुली कमी
अवैध उत्खनन रोखण्यासाठी १५ तालुक्यांत १०६ पथके तैनात असून जिल्हा खनिकर्म विभागाने एक एप्रिलपासून वेळोवेळी ५२ कारवाया केल्या आहेत. या पथकांनी ८५ लाख ७६ हजारांचा दंड आकारला असला तरी प्रत्यक्षात केवळ ४६ लाख १९ हजार रुपये वसूल केले आहेत.