मनोज मालपाणी : नाशिकरोडआगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनी आपापल्या भागात विविध विकासकामे, भूमिपूजनाचा धडाका लावला आहे, तर इच्छुकांनीदेखील विविध सामाजिक उपक्रम राबविण्यास सुरूवात केल्याचे चित्र दिसत आहे. निवडणुकीमुळे नगरसेवक व इच्छुकांनी ‘कनेक्टिव्हिटी’ वाढविण्यास सुरूवात केल्याचे सर्वसामान्यांमध्ये बोलले जात आहे. आगामी मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही इच्छुकांनी गेल्या वर्ष-दीड वर्षापासून जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केली होती. प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाल्यानंतर पक्षातील काही प्रमुख दावेदारांमुळे काही इच्छुकांना आपल्या स्वप्नांवर पाणी सोडावे लागले, तर काहीजण नव्याने इच्छुक झाले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रभागांत विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचा धडाकाच लावण्यात आला आहे. काही कामांच्या निविदा, टेंडर निघालेले नसताना सुद्धा भूमिपूजनाचा सोहळा घेण्यात येत आहे, तर आचारसंहिता लवकरच लागणार असण्याच्या शक्यतेने विविध पूर्ण झालेल्या किंवा काही पूर्ण होण्याच्या मार्गावर असलेल्या कामांचे लोकार्पण केले जात आहे. नवीन प्रभाग रचना लक्षात घेऊन त्या पद्धतीने भूमिपूजन व लोकार्पण सोहळे घेतले जात असल्याचे चित्र दिसत आहे.निवडणुकीतील इच्छुकदेखील मतदार ‘राजा’ला आकर्षित करण्यास मोबाइल, सीमकार्ड, आरोग्य शिबिर आदि सामाजिक उपक्रम राबवित आहे. तसेच साईपालखी आयोजन, महाप्रसाद, भंडारा, असे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करत आहे किंवा आर्थिक हातभार लावत आहे. जशी - जशी निवडणूक जवळ येत आहे तसे - तसे नवनवीन जनहितार्थ (?) फंडे वापरले जात आहे. लग्न, वाढदिवस, अंत्यविधी, घरगुती कार्यक्रम, कॉलनीतील छोटासा उपक्रम आदि कार्यक्रमांना सर्वच पक्षांचे इच्छुक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या आपुलकीने न चुकता हजेरी लावत आहे.
कार्यक्रमांचा धडाका; इच्छुकांचा आटापिटा
By admin | Published: January 03, 2017 1:46 AM