नाशिक : पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याने सर्वच क्षेत्रांतील व्यवहार रोडावले आहेत. याचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसला आहे. ऐन पेरणीच्या मोसमात शेतकऱ्यांकडे नवीन चलन नसल्याने बियाणे आणि रासायनिक खते खरेदी करणे अशक्य झाले आहे. रब्बी हंगामाची पेरणी रखडली असून, जिल्ह्णात अवघ्या ८.५ टक्केच पेरण्या झाल्या आहेत.यंदा जिल्ह्णात समाधानकारक पाऊस पडल्याने रब्बीच्या पेरणीस पोषक वातावरण आहे. दिवाळीनंतर गहू, हरभरा पेरणी तसेच लाल-उन्हाळ कांदा लागवडीची लगबग सुरू होते. बाजरी व मक्याचे पीक काढून त्याच शेतात रब्बीची पेरणी होत असल्याने आता रब्बीच्या कामांना गती आलेली असताना केंद्र शासनाने नोटा बंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांची परवड झाली असून, रासायनिक खते व बियाणे विक्रे ते त्यांना उभे करत नाहीत. परिणामी, गत आठ दिवसांपासून पेरणीला ब्रेक लागला आहे. गत वर्षी पावसाचे प्रमाण कमी असताना ८४ हजार २५४ हेक्टरवर ६३.९१ टक्के पेरणी झाली होती. या तुलनेत यंदा वरु णराजाची कृपादृष्टी असून, केवळ ९ हजार ७१३ हेक्टरवर अवघी ८.५ टक्के पेरणी झाली आहे. सिन्नर, निफाड, पेठ, इगतपुरी, दिंडोरी, कळवण, नाशिक या सात तालुक्यांमध्ये शून्य टक्के पेरणी झालेली दिसते. त्र्यंबकेश्वर, सुरगाणा आणि देवळा या तीन तालुक्यांत अवघ्या ४ टक्क्यांपर्यंत पेरणी आटोपली असताना नोटा बंदीच्या निर्णयामुळे बळीराजा हैराण झाला आहे. येवला, चांदवड व मालेगाव या तीन तालुक्यांमध्ये समाधानकारक पेरणी झालेली दिसते. प्रामुख्याने गत आठ दिवसांपासून शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते उधारीतही मिळत नाही आणि रोखीत घेण्यासाठी त्यांच्या हाती नवा पैसा नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी झालेली दिसते. (प्रतिनिधी)
नोटांच्या तुटवड्यामुळे रखडल्या रब्बीच्या पेरण्या
By admin | Published: November 17, 2016 12:18 AM