त्र्यंबकेश्वर : अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या संत निवृत्तिनाथ यात्रेची लगबग सुरू झाली असून, पालिका सभागृहात तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची नियोजित बैठक प्रांताधिकारी बाळासाहेब वाक्चौरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस तहसीलदार बहिरम, नगराध्यक्ष विजया लढ्ढा, उपनगराध्यक्ष संतोष कदम, मुख्याधिकारी निवृत्ती नागरे, धनंजय तुंगार, योगेश तुंगार, डॉ. भागवत लोंढे, डॉ. योगेश मोरे, पोलीस निरीक्षक देवीदास पाटील, परिवहन महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. यात्रा नियोजन बैठकीसह यात्रेत व्यवसायासाठी जागा ताब्यात घेणे, हॉटेल वगैरेंना रंगरंगोटी, सामान भरणे, तसेच गावात ट्रकद्वारे प्रासादिक वाणाच्या वस्तू, किराणा माल येत आहे. यात्रेच्या ४-५ दिवस अगोदर गावात रहाट पाळणे, विद्युत पाळणे, मौत का कुआॅँ, विद्युत चकऱ्या आदि मनोरंजनाची साधने येत असतात. केळीच्या ट्रक आपापल्या ठिकाणी येत असतात. येत्या २-३ दिवसात दिंड्या येतील. सर्व दिंड्या दशमीच्या दिवशी शहरात दाखल होतात. प्रत्येक दिंडीची जागा ठरलेली असते. दरम्यान, त्र्यंबक नगरपालिका यात्रेच्या तयारीला लागली असून, आरोग्य विभागाचे साहित्य कीटकनाशके, झाडू खरेदी आदि स्वच्छता विभागाचे साहित्य मागविण्याचे टेंडर्स काढले आहे. पाण्याचे, पथदीपांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी नगरसेवक मंडळी तसेच कर्मचारी वर्ग तयारीला लागले आहेत. पोलीस विभागाने सध्या हव्या असलेल्या बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. परिवहन महामंडळाने जादा गाड्यांचे नियोजन केले असून, यात्रेकरूंची गैरसोय होणार नाही असे नियोजन केले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे सर्व आखाड्यांना पाणी पुरविण्यात आले आहे. तथापि, यात्रेसाठी आलेल्या दिंड्यांना तात्पुरते पाणी पुरवावे, अशी दिंडीकऱ्यांची मागणी आहे.शहरात त्र्यंबक नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक माने, डॉ. भागवत लोंढे, पं. स. तालुका वैद्यकीय अधिकारी योगेश मोरे यांनी दिली.
संत निवृत्तिनाथ यात्रेच्या तयारीला वेग
By admin | Published: January 31, 2016 10:22 PM