मुकुंद बाविस्कर । लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : केवळ झाडांची रोपे लावून त्याकडे वळूनही न बघता पुन्हा पुढील वर्षी त्याच खड्ड्यात झाडांचे रोप लावण्याचा प्रकार सरकारी यंत्रणेकडून घडतो. परंतु हिंगणवेढे येथील शाळेचे विद्यार्थी मात्र याला अपवाद आहे. एक- दोन दिवस किंवा महिनाभर नव्हे तर वर्षभर पाणी घालून या विद्यार्थ्यांनी सुमारे अडीच हजार झाडे जगविली आहेत. विशेष म्हणजे पुन्हा यंदाही सीड बँकेचा उपक्रम राबवून आठ हजार बियांचे माळरान आणि डोंगरावर रोपण केले. नाशिक तालुक्यातील हिंगणवेढे येथील वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या संत जनार्दन स्वामी माध्यमिक विद्यामंदिर शाळेने पर्यावरण संवर्धनासाठी अनोखा उपक्रम राबविला आहे. शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव कुटे आणि शिक्षकांनी उन्हाळ्याची सुटी लागण्यापूर्वी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सुटीमध्ये जांभूळ, कडूलिंब, रिटा, चिंच, बाभूळ, आंबे, बोर, लिंबू, सीताफळ आदि झाडांच्या बिया जमा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांनी सुमारे आठ हजार बिया जमा केल्या. त्या सर्व बिया शेण मातीच्या गोळा करून छोट्या छोट्या खड्ड्यांमध्ये टाकण्यात आल्या. हिंगणवेढे येथील पाच एकर सरकारी गायरान जमिनीवर तसेच परिसरातील डोंगरावर छोटे-छोटे खड्डे घेऊन त्या गोळा केलेल्या दोन बिया खड्ड्यामध्ये टाकण्यात आल्या. गेल्या आठवड्यात शुक्रवारी (दि. २३) सदर उपक्रम राबविण्यात आला. त्यानंतर शनिवारी परिसरात दिवस पाऊस आल्याने बियारोपण उपक्रमाला पूरक ठरला. दरम्यान, मागील वर्षी शाळेतील विद्यार्थ्यांनी एक एकर परिसरात सुमारे तीन हजार रोपांची लागवड केली होती. त्यातील सुमारे अडीच हजार रोपे जीवंत असून, विद्यार्थ्यांनी सदर रोपांची नियमित काळजी घेत आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी आणि शाळा सुटल्यानंतर तसेच वेळ मिळेल तेव्हा विद्यार्थी या झाडांना पाणी घालतात, असे मुख्याध्यापक साहेबराव कुटे यांनी सांगितले. तसेच शाळेतील शिक्षक वाय. एस. चव्हाण, एस. एन. बोडके, राजेंद्र बच्छाव, अर्चना गायकवाड, विलास दरगुडे, ज्ञानेश्वर गिते आदि शिक्षक यासाठी सहकार्य करतात.
अडीच हजार झाडांचे विद्यार्थ्यांनी केले जतन
By admin | Published: June 27, 2017 12:37 AM