लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव बसवंत : येथे पंधरा दिवसांपूर्वीच रहावयास आलेल्या धुळे जिल्ह्यातील व्यक्तीने पत्नी आणि साडूच्या मुलाचा झोपेतच खून करून नंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.धुळे जिल्ह्यातील भुरसड येथील येथील रवींद्र भटू नागमल (३५) हे पवननगर परिसरात पंधरा दिवसांपूर्वीच रहायला आले होते. ते पत्नी सुरेखा (२७), साडूचा मुलगा विशाल विजय पानपाटील (१०) तसेच स्वत:चा मुलगा अमोल यांच्यासह रहात होते. सोमवारी सकाळी १० वाजता नळाला पाणी आल्याने शेजारी राहणाऱ्यांनी पाणी भरण्यासाठी नागमल यांना आवाज दिला. मात्र कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा उघडला असता रवींद्र याने छताला फाशी घेतल्याचे दिसले. ही घटना पोलिसांना कळविण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घराची तपासणी केली असता रवींद्र याने पत्नी सुरेखा हिला डोक्यात जड वस्तू मारून नंतर गळा आवळून मारल्याचे आढळून आले. तसेच साडूचा मुलगा विशाल पानपाटील यालाही कमरेच्या पट्ट्याने गळा आवळून मारल्याचे दिसून आले. या घटनेत झोपेत असलेला मयताचा मुलगा अमोल रवींन्द्र नागमल(वय ८ वर्ष) हा बचावला आहे. या खून आणि आत्महत्येमागे कोणते कारण असावे याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत. या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले करीत आहेत.
पत्नी, भाच्याचा खून करून आत्महत्या
By admin | Published: June 27, 2017 1:20 AM