नाशिक : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्त्येचे दुष्टचक्र नवीन वर्षातही कायम असून, नांदगाव तालुक्यातील तरुण शेतकऱ्याने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतात गळफास घेऊन आत्महत्त्या केली आहे. शांताराम तानाजी बच्छाव (३५) रा. हिंगणदेहरे, ता. नांदगाव असे या शेतकऱ्याचे नाव असून, १ जानेवारी रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास कुटुंबातील व्यक्ती झोपेत असल्याचे पाहून त्यांनी शेतातच गळफास घेतला आहे. नापिकी, कर्जबाजारी-पणाबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटाबंदीमुळे शेतमालाचे भाव कोसळल्याने बच्छाव यांनी आत्महत्त्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत. गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर २०१६ या संपूर्ण वर्षात जिल्ह्यात ८५ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत, तर २०१५ मध्येदेखील तितक्याच शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्त्या केल्या होत्या. शेतकरी आत्महत्त्येचे प्रमाण दोन्ही वर्षे कायम राहिल्याने प्रशासनही विचारात पडले आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्त्या पाहता शासनाने अनेक योजना जाहीर केल्या त्याचबरोबर प्रशासकीय पातळीवरही प्रयत्न करण्यात आले, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. साधारणत: महिन्याला सात ते आठ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या व विशेष म्हणजे निफाडसारख्या सधन तालुक्यातील शेतकऱ्यांचे आत्महत्त्येचे प्रमाण अधिक आहे.
नांदगावी शेतकऱ्याची आत्महत्त्या
By admin | Published: January 04, 2017 12:25 AM