पंचवटी : शेतजमिनीच्या वाटपावरून झालेल्या वादातून कुरापत काढून हिरावाडी रोडवरील क्षीरसागर कॉलनीत घरावर दगडफेक करीत घरासमोरील वाहनांच्या काचा फोडून शिवीगाळ केली व दहशत माजविण्याचा प्रयत्न झाला आहे.
निफाड तालुक्यातील दीक्षी येथील जमिनीचे वाटप होऊ देणार नाही, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली. तसेच घरावर दगडफेक केली आणि वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात सहा ते सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींमध्ये चौघा महिलांचा सहभाग आहे.
क्षीरसागर कॉलनीत राहणाऱ्या अलका रमेश कदम यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, सुशिला बाळासाहेब कदम, शिल्पा गवळी, प्रिया चुंबळे, सुलोचना मनीष कदम, चुंबळे यांचा मुलगा व अन्य इतर अशा सहा ते सात जणांनी गुरुवारी (दि. २४) सायंकाळी साडेसात वाजता येऊन घरावर दगडफेक करतानाच घरासमोरील वाहनांचीही तोडफोड केली. फिर्यादी व आरोपी एकमेकांचे नातेवाईक असून, त्यांची निफाड तालुक्यातील दीक्षी येथे शेतजमीन आहे. या जमिनीच्या वाटपावरून त्यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. त्याचा मनात राग धरून संशयितांनी गुरुवारी कदम यांच्या घराकडे येऊन घरावर दगडफेक केली. तसेच घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकी वाहनांच्या काचा फोडल्या व जमीन वाटप करून देणार नाही, असे म्हणत धमकी दिली. तसेच यांच्या सुनेला दगड मारून शिवीगाळ केली. त्यामुळे अलका कदम यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.