खामखेडा : केंद्र सरकारने पाचशे व हजारांच्या चलन दैनंदिन व्यवहारातून रद्द केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. चालू वर्षी उन्हाळी कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले होते. पुढे उन्हाळी कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेवर शेतकऱ्याने कांदा चाळीत साठवणूक करून ठेवला होता. परंतु मध्यंतरी आडतीच्या प्रश्नावरून तब्बल दीड महिना मार्केट बंद असल्याने शेतकऱ्यांचा कांदा विकला गेला नाही. नंतर मार्केट सुरू झाल्यानंतर कांद्याला भाव नसल्याने दिवाळी नंतर कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्याने कांदा चाळीत ठेवला. परंतु केंद्र सरकारने काळा पैसा बाहेर आणण्यासाठी मार्केट चालू होण्याच्या आधी चलनातून पाचशे व हजाराच्या नोटा रद्द केल्याने शेतकरी मार्केटमध्ये कांदा विक्रीसाठी नेल्यावर त्यास व्यापारी पाचशे व हजारांच्या नोटा देतो. या नोटा बंद असल्याने शेतकरी त्या नोटा आपल्या बॅँक खात्यावर जमा करीत आहे.
नोटाबंदीममुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत
By admin | Published: November 17, 2016 10:42 PM