खामखेडा : राज्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन झाल्याने कांद्याचे भाव घसरले आहेत. शेतकऱ्यांच्या पदरात पिकासाठी केलेला खर्चही पडलेला नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, तो मागील दोन महिन्यांपासून शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे.राज्यात मोठ्या प्रमाणात घेतल्या गेलेल्या कांदा उत्पादनामुळे भावात मोठी घसरण झाली. नफा तर सोडाच; परंतु उत्पादन खर्चही शेतकऱ्यांना मिळणे कठीण झाले होते. अशा अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रतिकिलो एक रुपया अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला.शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलास जरी मिळाला असला तरी यावर कांदा उत्पादक शेतकरी मात्र समाधानी नाही. आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना ऐन सणासुदीच्या दिवसात तरी सरकारकडून काहीतरी दिलासा मिळेल आणि कांदा अनुदानातून दिवाळी गोड होईल ही शेतकऱ्यांची अपेक्षा सरकार पूर्ण करेन, अशी अपेक्षा आहे. प्रतिकिलो केवळ एक रुपया अनुदान राज्य शासनाने देऊ केले आहे. किमान ते तरी योग्य वेळी पदरात पडेल, अशी अपेक्षा ठेवून असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा प्रशासनाकडून अपेक्षाभंग होताना दिसत आहे. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना कांदा अनुदानाची वाट पहावी लागत आहे.ज्या दोन महिन्यात विक्री केलेल्या कांद्याला अनुदान मिळणार आहे त्या दोन महिन्यापैकी जवळ जवळ दीड महिना सर्व मार्केट बंद असल्यामुळे शेतकऱ्याचा कांदा मार्केटला गेलाच नाही मग फक्त २०-२२ दिवस विक्री केलेल्या शेतकऱ्यांनाच या अनुदानाचा लाभ होणार असून, मे-जून महिन्यात विक्री केलेल्या शेतकऱ्यांना याचा कोणताही फायदा नसल्याने शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)
शेतकरी कांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत
By admin | Published: November 05, 2016 11:23 PM