पाटोदा : केंद्र सरकारने गेल्या मंगळवारपासून पाचशे व एक हजार रु पयांच्या नोटा चलनातून बाद केल्याच्या निर्णयाचा येथील सोमवारच्या आठवडे बाजारावरही परिणाम झाला आहे. चलन टंचाईमुळे आर्थिक व्यवहार मंदावले असून, आठवडे बाजारातील व्यवहारदेखील ठप्प झाले आहेत. पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर सर्वसामान्यांची आर्थिक लूट होत असल्याचे अनेक प्रकार घडत असल्याने सर्वसामन्यांचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे.येथील काही व्यावसायिक पाचशे व हजार रु पयांच्या नोटांच्या बदल्यात शंभर ते दीडशे रुपये कमी देऊन सर्वसामान्यांची मोठ्या प्रमाणात लूट करीत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तर काही व्यावसायिक ग्राहकांना गरज नसतानाही शंभर रुपयांऐवजी पाचशे व हजार रु पयांचा किराणा घेण्याचा आग्रह करीत आहे. काही डॉक्टर तसेच मेडिकल दुकानदार बाद झालेल्या नोटा स्वीकारत नसल्याने अनेक रुग्णांना सुट्या नोटांअभावी त्रास सहन करावा लागत आहे. या व्यावसायिकांनी ५०० व हजारच्या नोटा स्वीकारणार नाही, असे फलक रुग्णालयाबाहेर लावले आहेत. वास्तविक शासनाने वैद्यकीय सेवा देणाऱ्यांना चलनातून बाद झालेल्या नोटा स्वीकारण्याचे आदेश देऊनही या नोटा स्वीकारण्यास नकार देत असल्याने अशा व्यावसायिकांवर शासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)
आठवडे बाजारातील व्यवहार ठप्प
By admin | Published: November 15, 2016 12:23 AM