नाशिक : शहर स्मार्ट सिटी करण्यासाठी महापालिकेकडून व्यापक जनजागृती मोहीम राबविली जात आहे. स्मार्ट सिटी संकल्पनेत स्वच्छताही प्राधान्यावर असताना शहरातील अस्वच्छतेविषयी मात्र ठोस पाऊल उचलले जात नसल्याने शहरात मध्यवर्ती भागात कचऱ्याचे ‘ब्लॅक स्पॉट’ निर्माण झालेले आहेत. महापालिकेनेदेखील अशा प्रकारच्या स्पॉटच्या नावांची यादी जाहीर केलेली आहे. मात्र शहराच्या अस्वच्छतेचा चेहरा समोर आणू पाहणारे हे काळे डाग नष्ट होणार कधी आणि त्यासाठीच्या काय उपाययोजना आहेत, याविषयी सध्यातरी कोणतेही आशादायी चित्र दिसत नाही. शहर परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. एकूणच संपूर्ण शहर कचऱ्याच्या विळख्यात हरविले असून, या प्रश्नाकडे गांभिर्याने पाहिले जात नसल्याचे दिसते. मध्यंतरी पालिकेने यासंदर्भात एका खासगी संस्थेचीदेखील नियुक्ती केलेली होती. परंतु महापालिकेचा उद्देश सफल होऊ शकला नाही. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने रोगराईला निमंत्रण मिळत आहे. परिणामी मनपाची ‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक’ संकल्पना केवळ कागदापुरतीच मर्यादित आहे का असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी व दैनंदिन कचऱ्याच्या संकलनासाठी महापालिकेने प्रत्येक प्रभागामध्ये घंटागाड्यांची व्यवस्था केली आहे. तसेच सफाई कर्मचारीदेखील सर्वच प्रभागांसाठी स्वतंत्ररीत्या नियुक्त करण्यात आले आहेत; मात्र शहर स्वच्छ राहत नसल्याचे चित्र आहे. एकूणच मनपाची घंटागाडी व्यवस्थाही कुचकामी असल्याचे ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांवरून लक्षात येते. यावर महापालिकेने वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)
हे ‘ब्लॅक स्पॉट’ नष्ट होणार कधी?
By admin | Published: November 22, 2015 10:35 PM